गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.११: धानोरा तालुक्यातील कामनगड येथे झाडापापडा इलाक्यातील ग्रामसभांच्या वतीने १० फेब्रुवारीला भूमकाल दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला झाडापापडा इलाक्यातील २० ग्रामसभांमधील शेकडो नागरिक उपस्थित होते. त्यांनी पारंपरिक वेशभूषेत गोंडी नृत्य करीत, गाणी म्हणत हा दिवस साजरा केला. सुरुवातीला गाव गणराज्य शिलालेख व आदिवासी देवदेवतांचे पूजन करण्यात आले. यावेळी आदिवासींनी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन जल, जंगल व जमिनीसाठी संघर्ष करण्याचा संकल्पही केला.
गाव भूमिया देवराव गावडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, इलाका माजी जुरु गावडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, सामाजिक कार्यकर्ते गणेश हलामी, चंद्रपूर येथील आदिवासी महासभेचे गुरुदेव नन्नावरे उपस्थित होते. यावेळी वक्त्यांनी पेसा व वनहक्क कायद्यान्वये प्राप्त अधिकारातून ग्रामसभांनी आपापल्या क्षेत्रातील गावांचा सामूहिक विकास करावा, शिवाय जल, जंगल व जमिनीच्या हक्काचा लढा तीव्र करावा, असे आवाहन केले. राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचीनुसार, आदिवासींना त्यांचे स्वतंत्र कायदे लागू आहेत. शिवाय आदिवासी हे मूळनिवासी असल्याने त्यांना नागरिकत्व प्रमाणपत्र मागणे योग्य नाही, असे डॉ.नामदेव उसेंडी व गणेश हलामी म्हणाले.
गृहमंत्री अमित शहा यांनी पाचवी अनुसूची लागू असलेल्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये सीएए व एनआरसी लागू होणार नाही, अशी घोषणा केली आहे. त्याच धर्तीवर देशभरात पाचवी अनुसूची लागू असलेल्या क्षेत्रात हे दोन्ही अधिनियम लागू होणार नाही, अशी घोषणा करावी, अशी मागणीही डॉ.उसेंडी व हलामी यांनी केली. या कार्यक्रमाला छत्तीसगड व झारखंड राज्यातूनही काही नागरिकांनी हजेरी लावली होती.
काय आहे भूमकाल दिवस….
आपल्या जमिनीसाठी संघर्ष करणे, असा भूमकाल या शब्दाचा अर्थ आहे. १९१० मध्ये छत्तीसगड राज्यातील बस्तर भागात गुंडाधूर यांच्या नेतृत्वात हजारो आदिवासींनी जल, जंगल आणि जमिनीसाठी इंग्रजांविरुद्ध आपल्या पारंपरिक शस्त्रांनी युद्ध केलं. या युद्धात गुंडाधूर हे शहीद झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ छत्तीसगडमधील आदिवासी बांधव १० फेब्रुवारी हा दिवस भूमकाल दिवस म्हणून साजरा करतात. गडचिरोली जिल्ह्यातही आदिवासीबहुल भागात हा दिवस साजरा केला जातो.