गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.८: काल रात्री व आज सकाळी आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक धान खरेदी केंद्रांवर ठेवलेल्या हजारो क्विंटल धानाची नासाडी झाली आहे. शिवाय विटाभट्टी व रबी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
काल मध्यरात्रीनंतर गडचिरोली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज इत्यादी तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडला. आज सकाळी आरमोरी तालुक्यातील वडेगाव परिसरातही जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे तेथील सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी ठेवलेल्या धानाची नासाडी झाली. हे धान नाटकासाठी तयार केलेल्या खोलगट भागात ठेवण्यात आले होते. सुमारे १ हजार क्विंटल धान सडले आहेत. सकाळी काही शेतकऱ्यांनी स्वत: जाऊन ताडपत्री झाकली. मात्र, बहुतांश धान सडले असून, कोंब फुटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती अन्य केंद्रांवरही आहे. मागील चोवीस तासांत धानोरा तालुक्यातील चातगाव येथे सर्वाधिक ४०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धानोरा तालुक्यात २७.८, तर गडचिरोली तालुक्यात २५.२ मिलिमीटर पाऊस पडला. मुरुमगाव येथे २६.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान अवकाळी पावसामुळे विटाभट्टी व रबी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.