गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२१: नक्षलवाद आटोक्यात आणण्यात प्रशासनाला बऱ्याच अंशी यश आले असून, विकासाच्या माध्यमातूनच नक्षलवाद संपविण्यावर शासनाचा भर असल्याचे राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आज प्रथमच गडचिरोलीत आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा पोलिस मुख्यालयात पत्रकारांशी वार्तालाप केला. ते म्हणाले की, आतापर्यंत ६३८ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. जिल्ह्यात नक्षलवाद शून्यावर आणण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. मात्र, हे करताना नक्षलवादास खतपाणी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सिंचन, उद्योग, रोजगार या बाबींवर शासनाचा भर असून, जनतेवर काहीही न थोपविता त्यांना जे पाहिजे आहे; तेच देऊ, असे शिंदे म्हणाले. विकासासाठी ग्रामसभांच्या ठरावांची अंमलबजावणी करु, असेही शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी काही आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांचा पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला, प्रकल्प अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.