गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२: विविध कला ह्या आपल्या मनासाठी टॉनिक आहेत. जसजसे वय वाढते; तसतसे आपले शरीर वृद्ध होते. परंतु मनाचे तसे होत नाही. मन हे शेवटपर्यंत तरुण राहू शकते. म्हणून विविध कलांच्या माध्यमातून आपण स्वत:ला उल्हासित करावे कारण विविध कला मानवी मनाला सतत तरुण ठेवतात, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सिद्धार्थ विनायक काणे यांनी केले.
येथील गोंडवाना विद्यापीठात १७व्या आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य-२०१९’ चे उद्घाटन कुलगुरु झॅ.काणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर ,तर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, राजभवन निरीक्षक् समितीचे अध्यक्ष डॉ.सुनील पाटील, वित्त प्रबंधन समितीचे अध्यक्ष डॉ.एम.बी.पाटील, सदस्य डॉ.विजया पाटील, डॉ.ज्ञानोबा मुंडे, डॉ.वाणी लातूरकर, राजू हिवसे, विद्यार्थी विकास विभागाच्या संचालिका डॉ.प्रिया गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.कल्याणकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने ‘इंद्रधनुष्य-२०१९’ च्या आयोजनाची जबाबदारी राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाने गोंडवाना विद्यापीठाकडे सोपविली आहे. हा मंच जीवनाला कलाटणी देणारा असून, विद्यार्थ्यानी त्याचा उपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ईश्वर मोहुर्ले, संचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, तर आभार डॉ.प्रिया गेडाम यांनी मानले.
२ ते ६ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात राज्यातील २० विद्यापीठांमधील आठशे स्पर्धक सहभागी झाले आहेत.