गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१: अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील प्राणहिता नदीत आज सकाळी १० वाजताच्या सुमारास नाव उलटल्याने ६ प्रवासी बुडाले. त्यातील ४ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले असून, २ प्रवासी बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बानोत सुरेश शंकर नायक (२७) जिल्हा आसिफाबाद व मुंजम बालकृष्णम(२५), जिल्हा कागजनगर(तेलंगणा) अशी बेपत्ता व्यक्तींची नावे असून, ते तेलंगणा राज्यात वनरक्षक असल्याची माहिती पुढे येत आहे.
वांगेपल्ली येथील प्राणहिता नदी ओलांडली की, तेलंगणा राज्याची सीमा सुरु होते. नदीवर पूल नसल्याने दोन्ही राज्यातील प्रवासी नावेने प्रवास करतात. आज सकाळी वांगेपल्ली येथून एक नाव प्रवासी घेऊन तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्याच्या दिशेने जात होती. मात्र, मध्येच नाव हेलकावे घेऊन उलटली. या अपघातात ६ प्रवासी पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच तेलंगणा व गडचिरोली जिल्ह्याची आपत्ती निवारण चमू व पोलिस घटनास्थळी पोहचली असून, त्यांनी ४ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. त्यापैकी दोन जणांना गुंडेम येथील नदी काठावर, तर दोघांना वांगेपल्ली काठावर सुरक्षितरित्या पोहचविण्यात आले. मात्र अन्य दोघे बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे काम सुरु आहे.