गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२०: निवडणूक खर्च सादर केला नसल्याच्या कारणावरुन निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसी बळाचा वापर करुन आमच्या महिला उमेदवारास राहत्या घरुन नेल्याचा आरोप शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
श्री.जराते यांनी सांगितले की, जयश्री वेळदा ह्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रात शेकापच्या खटारा चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. निवडणूक खर्च सादर करण्यासाठी पक्षाने अधिकृत प्रतिनिधीची नेमणूक केली आहे. परंतु काही तांत्रिक कारणामुळे दोन-तीन दिवसांचा खर्च सादर केला नाही. त्यामुळे निवडणूक विभागाने उमेदवारास नोटीस पाठवून २० ऑक्टोबरपर्यंत निवडणूक खर्चाची तपासणी करुन घेण्यास सांगितले होते. परंतु उमेदवाराचा खर्च प्रतिनिधी बाहेर असल्याने तपासणी होऊ शकली नाही. अशातच आज शेकापच्या उमेदवार जयश्री वेळदा ह्या आपल्या घरी असताना निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे एक व पोलिसांचे एक अशी दोन पथके दोन वाहनांनी संध्याकाळी ६ वाजतानंतर वेळदा यांच्या घरी गेले. त्यांनी निवडणूक खर्च अधिकाऱ्यांनी बोलावल्याचे सांगून पोलिसांच्या वाहनात बसविले. त्यानंतर वेळदा यांनी खर्चाची फाईल पक्ष कार्यालयात असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी पक्ष कार्यालयाजवळ वाहन थांबविले. परंतु एका महिला उमेदवारास महिला पोलिस नसताना संध्याकाळी ६ वाजतानंतर नेणे ही गंभीर बाब असून, सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली हे कृत्य केल्याचा आरोप रामदास जराते यांनी केला. शेकापला मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने मुस्कटदाबी करण्यासाठी हा प्रकार केल्याचे जराते म्हणाले. यासंदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पत्रकार परिषदेला पक्षाचे जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, जयश्री वेळदा, विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम उपस्थित होते.
यासंदर्भात निवडणूक निरीक्षक श्री.घोष यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता त्यांनी आपणास पोलिसी बळाचा वापर करण्याचा अधिकारच नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले. वेळदा यांच्या प्रतिनिधीची खर्चाची वही आमच्याकडे राहिली होती. ती परत घेऊन जाण्यासाठी आम्ही त्यांना बोलावले होते. परंतु पोलिस कुठून आले, याविषयी आपणास कल्पना नाही, असे ते म्हणाले.