गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१०: काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या काळातील भ्रष्टाचार, निराशा व अस्वस्थतेच्या वातावरणातून बाहेर काढून भाजप सरकारने पाच वर्षांत राज्याला प्रगतिपथावर आणले. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात महायुतीला विक्रमी यश मिळेल, असा विश्वास खा.अशोक नेते यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, डॉ.भारत खटी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, गोविंद सारडा उपस्थित होते.
खा.अशोक नेते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने विविध समाज घटकांच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घेतले. ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी दिली असून, ४३ लाख ९२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे या योजनांमुळे शेतीचे सिंचन वाढले आहे. पीक विमा योजनेंतर्गत पाच वर्षांत १५ हजार १३५ कोटींची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे, असे खा.नेते यांनी सांगितले.
आपल्या प्रयत्नाने जिल्ह्यात १२ हजार २४६ कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय महामार्ग व अन्य कामे केली जात आहेत. वडसा-गडचिरोली लोहमार्गासाठी १६१ कोटी रुपये खेचून आणले. आमदारांनीही भरीव निधी आणला. त्यामुळे तिन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रचंड मताधिक्कयाने विजयी होतील, असा विश्वास खा.अशोक नेते यांनी व्यक्त केला.