गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१०: राज्यातील सरकार हे लुटारुंचं सरकार असून, या सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केली.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील इंदिरा गांधी चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात ६० हजार जागा रिक्त आहेत. त्यातील बहुतांश विद्यार्थी ओबीसी प्रवर्गातील आहेत. मागास समाजातील विद्यार्थ्यांनी शिकूच नये, असे सरकारचे धोरण असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. सरकारी कर्मचाऱ्याकडून सरकार करापोटी वसूल करीत असलेल्या रकमेतून राज्याच्या तिजोरीत २२ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यातून अॅग्रोबेस्ड उद्योगधंदे उभारल्यास बेरोजगारी दूर होण्यास मदत होऊ शकते, असे आंबेडकर म्हणाले. भाजप सरकारच्या काळात बँका डबघाईस आल्या असून, जनतेचा पैसा सुरक्षित राहिला नाही, असे आंबेडकर म्हणाले.
याप्रसंगी कोरची तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम निकोडे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. प्रकाश आंबेडकर यांनी निकोडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी पक्षाचे नेते डॉ.रमेश गजबे,रोहिदास राऊत, गडचिरोली विधानसभेचे उमेदवार गोपाल मगरे, आरमोरी क्षेत्राचे उमेदवार प्रा.रमेश कोरचा उपस्थित होते. राजन बोरकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.