गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१५: वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ भामरागडच्या पूरग्रस्तांना मदत करणार असल्याची माहिती आघाडीचे नेते डॉ.रमेशकुमार गजबे व रोहिदास राऊत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
डॉ.रमेशकुमार गजबे यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातून पूरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान भामरागड तालुक्यातील जनतेचे झाले आहे. त्यामुळे पक्ष तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार आहे. ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांना तातडीने घरे बांधून द्यावीत, यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रशासनाकडे पाठपुरावा करेल, असेही डॉ.गजबे यांनी सांगितले. जनतेनेही स्वेच्छेने पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन डॉ.गजबे यांनी केले.
रोहिदास राऊत यांनी सांगितले की, आम्ही केवळ वस्तूंच्या स्वरुपातच मदत स्वीकारणार आहोत. रोख रक्कम किंवा धनादेश द्यावयाचा झाल्यास तो मुख्यमंत्री सहायता निधीतच जमा करावा. नागरिकांनी गडचिरोली येथील चांदेकर भवनातील भारिप बहुजन महासंघाचे कार्यालय, तसेच अहेरी येथील पोलिस ठाण्यानजीकच्या अनिकेत ओंडरे यांच्या निवासस्थानी मदत सामग्री गोळा करावी, असे आवाहन श्री.राऊत यांनी केले. पुरामुळे धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शासनाने तत्काळ सर्वेक्षण करुन जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, पूरग्रस्त भागात आरोग्य शिबिरांचा कालावधी वाढवून पेयजल निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी, अशी मागणीही श्री.राऊत यांनी यावेळी केली.
पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे नेते गजानन कुकुडकार, बाळू टेंभुर्णे, प्रा.हंसराज बडोले, गोपाल मगरे, अरविंद सांदेकर, नीता सहारे, वनमाला झाडे, राजन बोरकर, मिलिंद अंबादे, स्नेहदीप खोब्रागडे, अशोक खोब्रागडे, पुण्यवान सोरते, हंसराज उंदिरवाडे, ज्योती उंदिरवाडे, मालाताई भजगवळी, अमिता मडावी, राजेंद्र बांबोळे, जी.के.बारसिंगे उपस्थित होते.