गडचिरोली, ता़१५
जिल्ह्यात सर्वत्र हिवताप आणि डेंग्यूची साथ सुरू असताना आरोग्य विभाग गाढ झोपेत असल्याचे दिसून येत आहे़ एटापल्ली तालुक्यात १ ते १० नोव्हेंबर या दहा दिवसांत तब्बल ६१७ रुग्णांना हिवतापाची लागण झाल्याचे रक्तचाचणीअंती दिसून आले आहे़
एटापल्ली तालुका दुर्गम व जंगलव्याप्त असून, अनेक गावांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही़ त्यामुळे या तालुक्यातील नागरिकांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या आजारांना बळी पडावे लागते़ यंदा मागील महिन्यापासून नागरिक तापाने फणफणत असल्याचे दिसून येत आहे़ एटापल्ली येथे एकमेव ग्रामीण रुग्णालय असून, तालुक्यात तोडसा, गट्टा व कसनसूर अशी तीन प्राथमिक आरोग्य केंदे्र व ३८ उपकेंदे्र आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने दहा दिवसांत ३०३२ रुगणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्रात १५३, कसनसूरमध्ये १८१ , गट्टा केंद्रात १०९ व ग्रामीण रुग्णालयात १७९ असे एकूण ६१७ मेलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. आॅक्टोबर महिन्यात आरोग्य तपासणीदरम्यान ४१५ रुग्ण मलेरियाने आढळून आले होते. मात्र नोव्हेंबरच्या दहा दिवसांत ६१७ रुग्ण आढळून आल्यामुळे सर्व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. असद फहीम यांच्याशी संपर्क साधला असता, मलेरिया आजार आटोक्यात आणण्याकरिता आरोग्य विभागाचे कर्मचारी गावागावात जाऊन नागरिकांना मलेरियाच्या गोळ्यांचे वाटप करून जनजागृती करीत असल्याचे सांगितले.