शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली जिल्ह्यात भयावह पूर परिस्थिती: हजारो गावांचा संपर्क तुटला, शेकडो घरे क्षतिग्रस्त

Friday, 6th September 2019 06:22:42 AM

गडचिरोली,ता.६: मागील पाच दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्याने जिल्ह्यातील तब्बल १७ मार्ग बंद झाले असून, हजारो गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे, तर अनेक ठिकाणी ये-जा करणारे नागरिक अडकून पडले आहेत. अनेक गावांमध्ये शेकडो घरे क्षतिग्रस्त्‍ झाली आहेत. गडचिरोली-नागपूर मार्ग बंद झाला आहे.

दरम्यान, गोसेखुर्द धरणाचे १९दरवाजे दीडमीटरने, तर १४ दरवाजे १ मीटरनेउघडण्यात आले असून, त्यातून ९२३४क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा पूर परिस्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील तब्बल १७ मार्ग बंद असल्याने हजारो गावांचा संपर्क तुटला आहे.

गोगावनजीकच्या पाल नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने गडचिरोली-नागपूर मार्ग, तसेच शिवणी नाल्यावर पूर असल्याने गडचिरोली-चामोर्शी मार्गही बंद झाला आहे.

कुरखेडा-वैरागड-रांगी, आलापल्ली-भामरागड, कमलापूर-रेपनपल्ली, आरमोरी-देसाईगंज, शंकरपूर-बोडधा, फरी-किन्हाळा, एटापल्ली-आलापल्ली, भामरागड-लाहेरी, चातगाव-पेंढरी, मानापूर-पिसेवडधा, हल्दी-डोंगरगाव, कोरची-बोटेकसा, धानोरा-मालेवाडा, चोप-कोरेगाव, वैरागड-वासाळा हे मार्ग बंद झाले आहेत. सिरोंचा तालुक्यातील मोसम गावाजवळ पुरामुळे वाहतूक ठप्प्‍ झाली आहे. कुरखेडा-वैरागड मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गावर मोसम-नंदीगाव-झिमेला नाल्यावर पाणी असल्याने दोन्ही बाजूंना वाहने अडकली आहेत. अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे मध्यरात्री पुराचे पाणी गावात शिरल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू मदत कार्य करीत आहे. वैरागड येथे २० हून अधिक घरे क्षतिग्रस्त झाली आहेत. हीच स्थिती अनेक खेड्यांमध्येही आहे.

आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील २५ नागरिक पुरात अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन विभाग व पोलिसांनी त्यांना बोटीद्वारे सुरक्षितरित्या बाहेर काढले. कुरखेडा तालुक्यातील जुनी अरततोंडी येथील शंभर नागरिकांना सकाळी सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले, तर अन्य शंभर जणांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

मागील चोवीस तासांत आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा येथे सर्वाधिक २३४.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EH1AG
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना