मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोलीच्या भौतिक, सामाजिक विकासाकडे सरकारचं दुर्लक्ष: नाना पटोले

Thursday, 29th August 2019 06:41:25 AM

गडचिरोली,ता.२९: जिल्ह्याच्या भौतिक व सामाजिक विकासाकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष होत असून, समस्या ‘जैसे थे’ ठेवण्याचं धोरण राज्यकर्ते अवलंबत असल्याची टीका काँग्रेसचे प्रचार समितीप्रमुख माजी खासदार नाना पटोले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

महापर्दाफाश यात्रेनिमित्त गडचिरोलीत आलेल्या नाना पटोले यांनी आज सकाळी आपली भूमिका मांडली. सरकारचं अपयश लोकांपुढे मांडणे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्राण ओतण्यासाठी पर्दाफाश यात्रा काढल्याचे ते म्हणाले. आदिवासी भागाच्या विकासासाठी निधी देण्याची संवैधानिक व्यवस्था आहे. परंतु आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये बंधारे बांधण्यासाठी ३०० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. ह्या निविदा ५ टक्के अधिक रकमेच्या आहेत. आंध्रपदेशातील तिरुपती येथील एका कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे. हा माणूस वित्तमंत्र्यांच्या मर्जीतील असून, यातून पैशाची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ३३ कोटी वृक्षलागवड योजनेत झाडं कुठून खरेदी केली, त्यांचं संगोपन किती झालं, या प्रश्नांची उत्तरे मिळणं आवश्यक असून, या योजनेचे सोशल ऑडिट करावे, अशी मागणही श्री.पटोले यांनी केली.

जिल्ह्यात ओबीसी आरक्षण पूर्ववत होणे गरजेचे आहे. परंतु भाजप सरकारने पाच वर्षांत हे काम केले नाही. निवडणूक आली की ओबीसींना आश्वासन द्यायचे आणि सत्ता येताच त्यांना जमिनीत गाडायचे, असा हा प्रकार आहे. येथे रेल्वे येऊ शकली नाही. अनेक प्रश्न सुटले नाहीत, अशी टीका पटोले यांनी केली.

सुरजागड पहाडावरुन लॉयड मेटल्सने किती खनिज नेले, सरकारकडे किती रॉयल्टी भरली, याची माहितीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध नाही. हा प्रकार म्हणजे दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला.

‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ या नावावर काही लोक यात्रा काढत आहेत. ही यात्रा म्हणजे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र आहे, तसेच ठरवून आखलेली ही रणनीती आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

पत्रकार परिषदेला काँग्रेसच्या शेतमजूर युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम पांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, आदिवासी नेत्या कुसुम आलाम, युकाँ नेते पंकज गुड्डेवार, युकाँचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे,देवाजी सोनटक्के, जि.प.सदस्य मनोहर पोरेटी, वामनराव सावसाकडे उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
BIUV1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना