शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

गडचिरोलीत व्यसनमुक्तीचा इतिहास घडत आहे: पद्मश्री डॉ.अभय बंग

Tuesday, 27th August 2019 06:05:43 AM

गडचिरोली, ता.२७: दारु व तंबाखूबंदीसारखे प्रयोग अमेरिकेत राबविल्यानंतर तेथे ते केवळ २ टक्के यशस्वी झाले. महाराष्ट्रातही हे प्रमाण तेवढेच आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्यात मुक्तिपथ अभियान सुरु झाल्यानंतर येथे ११ टक्के तंबाखू व ३० टक्के दारु सेवनाचे प्रमाण कमी झाली आहे. याचा अर्थ गडचिरोलीत इतिहास घडत असून, सलग ३२ वर्षे एखाद्या सामाजिक विषयावर चाललेले आंदोलन हे अभूतपूर्वच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.अभय बंग यांनी येथे केले.

‘सर्च’द्वारे संचालित ‘मुक्तिपथ’ अभियानाच्या वतीने दारु व तंबाखुमुक्तीसंदर्भात प्रसारमाध्यमांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत जिल्हा वर्धापनदिनी(ता.२६) माध्यम प्रतिनिधींना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून दैनिक ‘सकाळ’चे सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे, गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष जयंत निमगडे, मुक्तिपथचे प्रमुख डॉ.मयूर गुप्ता, संतोष सावळकर उपस्थित होते.

डॉ. बंग पुढे म्हणाले, रोग निर्माण करण्याची ७ कारणे असून, दारु व तंबाखू ही दोन प्रमुख कारणे आहेत. समाज या विळख्यात अडकत चालला असून, त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी आमचे प्रयत्न्‍ सुरु आहेत. मुक्तीपथनंतर गडचिरोली जिल्ह्यातील ४५० गावांनी दारुविक्री बंद केली, तर १८० गावांनी दारु व तंबाखूवर बंदी घातली. १४०० शाळांमध्ये व्यसनमुक्तींचे कार्यक्रम झाले. शिबिरांमध्ये १ हजार लोकांवर उपचार झाले. ६०० गावांमध्ये महिलांमुळे ग्रामसभा व स्त्रियांचं सबळीकरण झालं. परंतु महाराष्ट्राच्या मीडियानं त्याची दखल घेतली नाही, अशी खंत डॉ.बंग यांनी व्यक्त केली. व्यसनमुक्तीच्या कार्यात्‍ पत्रकार करीत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मुक्तीपथच्या कार्याचं कौतुक करुन प्रशासन दारुबंदी व तंबाखुबंदीसाठी पूर्ण सहकार्य करेल, असं आश्वासन दिलं. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद काळबांडे म्हणाले की, पत्रकार हा सतत उपेक्षाचा धनी असतो. अनेकदा तटस्थपणे लिहिताना पत्रकारांना विरोध पत्करावा लागतो. असा विरोध पत्करत असतानाच पत्रकारांनी विकासाचे दूत व्हावे, असे आवाहन श्री.काळबाडे यांनी केले. प्रेसक्लबचे अध्यक्ष जयंत निमगडे म्हणाले की, दारु व तंबाखूच्या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी डॉ.अभय बंग यांच्या नेतृत्वात मुक्तीपथने विक्रेत्यांचा रोष पत्करुन काम सुरु ठेवले आहे. पत्रकारांनीही या कामाला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. समाजविघातक गोष्टींशी लढण्याची ‘नशा’ अंगी असलेला व्यकतीच अशा प्रवृत्तीविरुद्ध लढू शकतो, असेही श्री.निमगडे म्हणाले. याप्रसंगी डॉ.मयूर गुप्ता यांचेही भाषण झाले.

यावेळी दारु व तंबाखूमुक्तीसंदर्भात्‍ वार्तांकन करणाऱ्या मुद्रित माध्यमांसह वेब पोर्टलच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते   धनादेश  व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संतोष सावळकर, तर आभार पराग मगर यांनी मानले.

 

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
814J9
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना