गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१७:शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या विकासासाठी गेल्या ७२ वर्षातील योगदान आणि पक्ष कार्य घराघरात पोहचविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते व शेकापच्या गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या संभाव्य उमेदवार जयश्री वेळदा यांच्या नेतृत्वात पक्षाच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये लवकरच ‘जनसंवाद- विकासाच्या शोधात शेकापची यात्रा’ आयोजित करण्यात येणार आहे.
या यात्रेदरम्यान जिल्हा परिषद.क्षेत्रनिहाय गावांमध्ये जाऊन गावातील मुख्य चौकात छोटेखानी सभा घेऊन सध्याच्या सरकारने केलेल्या विकासाबद्दल जनतेची मते जाणून घेण्यात येणार आहेत. तसेच विकासासंबंधाने जनतेची नेमकी काय अपेक्षा आहे,हे जाणून घेण्यात येणार आहे. तसेच शेकापची विधानसभा निवडणूक लढविण्यामागील भूमिका लोकांपुढे मांडण्यात येणार आहे.
या यात्रेकरिता स्टेज,स्पीकर, एलईडी टीव्हीने सज्ज असलेला एक प्रपोगंडा ट्रक व दोन चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही यात्रा सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत राहणार असल्याची माहिती शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी दिली..