गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१३: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्याच्या पूर्वोतर भागात काल रात्रीपासून संततधार पाऊस पडत आहे. पुरामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला असून, गडचिरोली-नागपूर, आष्टी-चंद्रपूर व आलापल्ली-भामरागड या प्रमुख मार्गासह दहापेक्षा अधिक मार्ग बंद झाले आहेत. दरम्यान पोलिस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये पुरात अडकलेल्या १२ जणांचे प्राण वाचविले.
रात्रीपासून पाऊस पडत असल्याने गडचिरोली शहरातील अनेक वॉर्डांमध्ये पाणी शिरले आहे. नगर परिषद कार्यालयाच्या आवारालाही तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. कन्नमवार वॉर्ड, विवेकानंदनगर इत्यादी सखल भागात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. चामोर्शी रस्त्यावरील केमिस्ट भवनजवळ पाणी साचल्याने वाहतूक बंद होती. प्रशासनाच्या मदतीनंतर संध्याकाळी पाण्याला वाट मोकळी करुन देण्यात आली.
मागील २४ तासांत गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक १२६ मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल आरमोरी तालुक्यात ९९.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, गोसेखुर्द प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून ४३५ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. चामोर्शी तालुक्यातील चिचडोह प्रकल्पाचे ३८ दरवाजे उघडून २२४३.५३ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. नाल्यांना पूर आल्याने गडचिरोली-नागपूर, आष्टी-चंद्रपूर व आलापल्ली-भामरागड या प्रमुख मार्गांसह गोगाव-दिभना, मौशीखांब-वडधा, धानोरा तालुक्यातील येरकड-मालेवाडा, कुरखेडा तालुक्यातील कढोली-वैरागड व आरमोरी तालुक्यातील वैरागड-विहीरगाव, मानापूर-देलनवाडी, वैरागड-रांगी, चातगाव-साखेरा, गडचिरोली-चामोर्शी, तळोधी-आमगाव, घोट-रेगडी हे मार्ग बंद आहेत. कारवाफा नाल्यावर पाणी वाढत आहे.
दरम्यान आज सकाळी गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव येथून एक टाटा सुमो प्रवाशांना घेऊन् गडचिरोलीकडे येत असताना गुरवळा येथील नाल्याच्या पुरात अडकली. माहिती मिळताच महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांनी सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. टाटा सुमोत २ महिला व ८ पुरुष असे १० जण होते. तसेच सकाळी चांदाळा मार्गावरील कुंभी नाल्यावरील अडकलेल्या एका व्यक्तीला व धानोरा तालुक्यातील कन्हारटोला येथील एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यात पोलिस व महसूल प्रशासनाला यश आले. जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी क्रिष्णा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थितीवर प्रशासन लक्ष् ठेवून आहे.