गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.८: काल रात्रीपासून पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागड गावात शिरले असून, सुमारे साडेतीनशे नागरिक पुरामुळे बाधित आहेत. दुकानदारांचेही मोठे नुकसान झाले आहे. तेथील ५० कुटुंब व ५० दुकानदारांना गावातीलच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे वसतिगृह, पंचायत समितीचे सभागृह व तहसील कार्यालयात हलविण्यात आले आहे. भामरागड गावाला बेटाचे स्वरुप आले असून, प्राणहिता व इंद्रावती नद्याही फुगल्या आहेत.
भामरागडची स्थिती लक्षात घेता पर्लकोटा नदीवर पूल बांधण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. आता तो दिवस केव्हा उजाडतो आणि भामरागड तालुकावासीयांच्या व्यथांना केव्हा पूर्णविराम मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेडपल्ली येथील संजय कोडापे हा इसम पामुलगौतम नदीत वाहून गेला, तर २ वासरे आणि ३ गायींचाही मृत्यू झाला आहे.
दरम्यान गोसेखुर्द प्रकल्पाचे २५ दरवाजे अर्धा मीटरने, तर ९ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यातून ४५३८ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.