बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

विरोधी पक्षांचे नेते म्हणजे नापास झालेले विद्यार्थी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, 4th August 2019 06:51:54 PM

गडचिरोली, ता.5: आम्ही विरोधी पक्षात होतो तेव्हा संघर्ष यात्रा काढत होतो आणि सत्तेत असताना संवाद यात्रा काढतो. परंतु सध्याच्या विरोधी पक्षांचे नेते काहीच करताना दिसत नाही. जनतेचे प्रश्न उचलायला ते तयार नाहीत. हे विरोधी पक्ष नेते म्हणजे नापास झालेले विद्यार्थी आहेत, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल(ता.४) येथे केली.

येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित महाजनादेश यात्रेला संबोधित करताना ते बोलत होते. मंचावर राज्यमंत्री परिणय फुके, खा.अशोक नेते, आ.प्रा.अनिल सोले, आ.गिरीश व्यास, आ.कृष्णा गजबे, आ.बंटी भांगडिया,  आ.डॉ.देवराव होळी, आ. सुजित ठाकूर, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगिता पिपरे, प्रदेश सदस्य बाबूराव कोहळे, किशन नागदेवे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, डॉ.भारत खटी, प्रमोद पिपरे, सुधाकर यनगंधलवार यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.

श्री.फडणवीस पुढे म्हणाले, विरोधी पक्ष २१ तारखेला मोर्चा काढणार आहेत. मात्र, हा मोर्चा शेतकरी, मजूर वा महिलांच्या हक्कांसाठी नसून, तो ईव्हीएम विरोधात आहे. ईव्हीएम मत देत नाही तर जनता मत देत असते, हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुणी सांगावं, असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्सुनामीत मोठमोठे नेते वाहून जाणार आहेत. विरोधी पक्षनेते जनतेपासून दूर जात आहेत. त्यांना पराभव समोर दिसतो आहे, असे फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करुन त्यासाठी ३ हजार कोटी रुपये दिले. गडचिरोली जिल्ह्यात पेसा कायद्यान्वये शंभ्रर टक्के जागा आदिवासींना दिल्यामुळै गैरआदिवासींवर अन्याय होत आहे.  त्यामुळे ओबीसींचं आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली आहे. येत्या १५ दिवसांत त्याचे परिपत्रक निघेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आदिवासी विद्यार्थ्याना नामांकित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. राज्यात ५० हजार विद्यार्थी अशाप्रकारच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. जुन्या सरकारने शेतकऱ्यांना १५ वर्षांत ३० हजार कोटी रुपये दिले. परंतु भाजप सरकारने अवघ्या ५ वर्षांत ५० हजार कोटी रुपये दिले. पाच वर्षांत प्रत्येक वर्षी धानाला बोनस दिला. मागच्या वर्षी ५०० रुपयांचा बोनस दिला. यंदाही तो देणार आहोत. शेवटच्या वंचित शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाल्याशिवाय सरकारची कर्जमाफी होणार नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पाच वर्षांत ३० हजार किलोमीटरचे ग्रामीण रस्ते तयार केले. आरमोरी क्षेत्रात २२५ कोटीेचं रस्ते तयार केले. ६५० कोटी रुपयांचे रस्ते राष्ट्रीय व राज्य महामार्ग योजनेंतून केले. १८ गावांमध्ये पेयजलाच्या योजना तयार केल्या. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ६ लाख नागरिकांना घरे दिली. ग्रामीण व शहरी नागरिकांनाही जागा व घरे बांधून देण्याचं काम सरकारनं केले. २०२१ पर्यंत एकही माणूस बेघर राहणार नाही. प्रत्येकाला घर देण्याचा निर्धार सरकारने केला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून १० हजार विहिरी शेतकऱ्यांना देऊन त्यांना वीज दिली. तलाव गाळमुक्त केले. नगर परिषदा व पंचायतींना भरपूर निधी दिला. चिचडोह बॅरेजला ५९७ कोटी रुपये दिले. तसेच जिल्ह्यातील वैनगंगा, खोब्रागडी, वैलोचना इत्यादी नद्यांवर बॅरेजेस बांधण्याचा विडा सरकारने उचलला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन रवींद्र ओल्लालवार यांनी केले.

राष्ट्रवादीच्या दोघांचा भाजपात प्रवेश

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते संजय निखारे व मनिषा खेवले यांच्यासह अन्य एकाने मुख्यमंत्री येण्यापूर्वी भाजपात प्रवेश केला.

अम्ब्रिशराव आत्राम यांची अनुपस्थिती

दरम्यान देसाईगंज व गडचिरोली अशा दोन्ही ठिकाणच्या सभेत माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी गैरहजेरी लावली. मंत्रिपदावरुन हटविल्यामुळे आत्राम प्रचंड नाराज असून, ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
NV5KN
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना