गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.३: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीरिपा-शेकाप इत्यादी धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी भाजप-सेना युतीला टक्कर देण्यास सज्ज असून, गडचिरोली विधानसभा क्षेत्र शेतकरी कामगार पक्षाला मिळावे, यासाठी पक्ष आग्रही असल्याची माहिती शेकापचे मुंबई येथील कार्यालयीन चिटणीस अॅड.राजेंद्र कोरडे यांनी काल(ता.२) येथे पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला शेकापचे खजिनदार राहुल पोकळे(पुणे), राहुल देशमुख(काटोल), जिल्हा चिटणीस रामदास जराते उपस्थित होते. अॅड. कोरडे यांनी सांगितले की, शेकापने कष्टकरी लोकांसाठी काम केले आहे. मात्र, जात, धर्म व अन्य भावनिक विषयांवर राजकारण करुन काही पक्ष मूळ प्रश्नांना बाजूला सारत आहेत, अशी टीकाही अॅड.कोरडे यांनी केली.
शेकाप हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत असल्याने विदर्भात किमान दोन जागा शेकाप लढण्यास इच्छूक आहे. गडचिरोलीच्या जागेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने सकारात्मक भूमिका घेतल्याची माहितीही अॅड.कोरडे यांनी दिली.
गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण डावलण्याचे काम सत्ताधारी पक्ष करीत असल्याचा आरोप करुन अॅड.कोरडे म्हणाले की, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, यासाठी शेकाप सातत्याने लढा देत आहे. जिल्ह्यात वनोपजावर आधारित उद्योग निर्माण व्हावेत, अशी पक्षाची भूमिका आहे. मागील दोन वर्षांपासून रामदास जराते यांच्या नेतृत्वात शेकापने जिल्ह्यात मोठे काम उभे केले असून, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची पावतीही कोरडे यांनी दिली.