गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१५: विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून शासन दहावी व बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची जुलै महिन्यात परीक्षा घेत असते. यंदा गडचिरोली जिल्ह्यात दहावीची परीक्षा १२, तर बारावीची परीक्षा ६ केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा दक्षता समितीच्या सभेत निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी यासंबंधीचा आढावा घेतला. १७ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या बारावीच्या परीक्षेला २२२३, तर १७ जुलै ते २९ जुलै या कालावधीत होणाऱ्या दहावीच्या परीक्षेला ३५०६ विद्यार्थी बसणार आहेत.
यावेळी त्यांनी परीक्षाकाळात गैरप्रकार घडू नये याविषयी संबंधित विभागप्रमुख व पोलिसांना सूचना केल्या. जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ.एपीजे अब्दुल कलाम कॉपीमुक्त अभियान सुरु केले आहे. त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करावी, असे श्री.पाटील म्हणाले. भरारी पथकात विभागाचे शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी व प्राचार्यांचा समावेश असून, प्रत्येकाचे नियोजन काय असेल, याचीही सभेत चर्चा झाली. दरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.