गडचिरोली | --°C | --°C |
कुरखेडा, ता.२०: तालुक्यात आज संध्याकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात १० जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना गडचिरोलीला हलविण्यात आले आहे.
पहिला अपघात संध्याकाळी ६ वाजता वासी गावाजवळ घडला. कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर येथील काटेंगे परिवारातील लग्नकार्य आटोपून धानोरा तालुक्यातील गट्टेपायली(चातगाव) येथे काही वऱ्हाडी ट्रॅक्टरने परत जात होते. दरम्यान वासी गावाजवळ ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. यात धानु आतला(४८), मधुकर मडावी (७५), वासुदेव बोगा(३८), सोमा दुगा(४३), नानु बोगा(३७), चेंडू हलामी(५५) हे जखमी झाले. सर्वजण गट्टेपायली येथील रहिवासी आहेत. याच ट्रॅक्टरमध्ये कढोली येथे बाजारासाठी आलेल्या सुरेखा पुराम(३०) व यशोदा पुराम(४०) या दोन महिला बसल्या होत्या. त्याही जखमी झाल्या. सर्व जखमींना १०८ रुग्णवाहिकेने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल, भाजपचे जिल्हा सचिव विलास गावंडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची आस्थेने विचारपूस केली
दुसरा अपघात पावणे सात वाजता लेंढारी गावाच्या अलिकडे असलेल्या पुलाजवळ घडला. कूरखेडा येथील दिलीप संघेल (५५) व मैनाबाई पुडो (५०) हे दोघे मोटारसायकलने कूरखेडा येथून लग्नसभांरंभाकरिता लेंढारी येथे जात असताना त्या गावाच्या अलिकडे असलेल्या पुलावर अपघात झाला. यात दोघेही जखमी झाले असून, त्यांना उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याच पुलावर नक्षल्यांनी १ मे रोजी भूसुरुंगस्फोट घडविला होता. त्यात १५ जवान व १ खासगी वाहनचालक शहीद झाले होते.