गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१४: गेल्या काही दिवसांपासून सूर्याचे आग ओकणे थांबलेले नाही. आजपासून १८ मेपर्यंत पुन्हा पाच दिवस विदर्भात तीव्र उष्णता राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांश सर्वच जिल्ह्यांचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहत आले आहे. उष्णतेमुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. मात्र, नजीकच्या काही दिवसांत यात काहीही बदल होण्याची शक्यता नसून, उष्णतेच्या झळा आणखी तीव्र होणार आहे. १४ मे रोजी चंद्रपूर, वर्धा व नागपूर जिल्ह्यात तीव्र उष्णता असेल. १५ मे रोजी अकोला, वर्धा, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात प्रचंड उष्णता असेल. १६ तारखेला अकोला, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर जिल्ह्याचे तापमान अधिक असेल. १७ व १८ मे रोजी अकोला, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात उष्णतेच्या झळांचा त्रास होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.