गडचिरोली | --°C | --°C |
अहेरी, ता.८: यंदाची लोकसभा निवडणूक देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची असून, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकारला निवडून द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे भाजप-सेना-रिपाइं युतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ अहेरी येथील हॉकी ग्राउंडवर आयोजित विजय संकल्प प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
या सभेला पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, उमेदवार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.रामदास आंबटकर, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, प्रकाश गेडाम, सभापती माधुरी उरते उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, काँग्रेसच्या राजवटीत भ्रष्टाचार व अनाचार बोकाळला होता. जनता त्रस्त झाली होती. त्यामुळे जनतेने मोदी सरकारला कौल देऊन सत्तेवर बसविले .प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने सामान्य माणसाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. सामान्य माणसाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. काँग्रेसचा जाहीरनामा हा जनतेला एप्रिल फुल बनविणारा आहे. राहुल गांधी यांनी गरिबी हटावचा नारा दिला. त्यांचे वडील राजीव गांधी व आजी इंदिरा गांधींनीही हाच नारा दिला होता.. परंतु सामान्य माणसाची गरिबी तर हटलीच नाही; उलट कॉंग्रेसवाल्यांची गरिबी मात्र हटली. त्यामुळे जनतेला मूर्ख बनविणाऱ्या काँग्रेसला हद्दपार करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले.
मोदी सरकारने जनधन योजनेतून ३४ कोटी गरीब लोकांचे बँकेत खाते उघडले. यातून सरकारी योजनेचा लाभ थेट त्यांच्या खात्यात जमा होत आहे. यातून सरकारी भ्रष्टाचाराला चाप बसला आहे. स्वछ भारत योजनेतून देशात शोचालय बनविण्यात आले यातून ग्रामीण भागातील महिलांना उघडयावर शौचास जाण्याची गरज राहिली नाही. उज्ज्वला गॅस योजनेतून १३ कोटी जनतेला मोफत गॅसची सोय केली, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांत वीज पोहोचली नव्हती. आमच्या सरकारने २०० अतिदुर्गाम गावात वीज पोहोचवून गावे विजेने प्रकाशित केली. महाराष्ट्रात २०२२ पर्यंत एकही गरीब बेघर राहणार नाही, त्यासाठी आवास योजनेतून ५ लाख घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात ३ लाख लोकांचे अतिक्रमण नियमित करण्यात आले आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून देशात १३ कोटी जनतेला विनातारण कर्ज देण्यात आले आहे. यात ६० टक्क्े महिलांना कर्ज देऊन त्यांना उद्योगधंद्यासाठी आत्मनिर्भर बनविण्याचे काम सरकारने केले आहे. आयुष्यमान भारत योजनेतून ५० कोटी गरीब जनतेला ५ लाखापर्यंतचे उपचार, शस्त्रक्रिया मोफत देण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत.
पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यानं दरवर्षी ६ हजार रुपये देण्यात येत आहेत. भाजपा सरकारच्या काळात दळणवळणाच्या सोयीसाठी नद्यांवर पुलाचे काम,राष्ट्रीय महामार्ग जिल्हयात मंजूर करण्यात आली असून, ही कामे प्रगतिपथावर आहेत. गडचिरोली जिल्ह्यात रस्ते, पूल, राष्ट्रीय महामार्गाची १५ हजार कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. येथील आदिवासींसाठी वनजमिनीचे १ लाख ७७ हजार दावे मंजूर करण्यात आले आहेत. देशात वनहक्क दावे मंजूर करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे.त्यासोबतच गैरआदिवासी व बंगाली नागरिकांसाठी जमिनीच्या पट्ट्यासाठी तरतुदी करून सर्वेक्षण सुरू आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.