गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.७:पाच वर्षाच्या कार्यकाळात सरकारने जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी दिला आहे. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा अशोक नेते यांना निवडून दिल्यास पुढील पाच वर्षांत वडसा-गडचिरोली लोहमार्गाचे काम पूर्ण करु, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे भाजप-सेना-रिपाइं युतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ देवकुले पटांगणावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. याप्रसंगी आदिवासी विकास व वनराज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खा.अशोक नेते, विधान परिषद सदस्य डॉ.रामदास आंबटकर, आ.कीर्तिकुमार भांगडिया, आ.कृष्णा गजबे, आ.संजय पुराम, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, नगराध्यक्ष योगीता पिपरे, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, किशन नागदेवे, शिवसेना नेते अरविंद कात्रटवार, रिपाइं नेते संतोष रामटेके, परिवर्तन पॅनलचे प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, संजय गजपुरे, डॉ.भारत खटी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.मुनगंटीवार पुढे म्हणाले, यापुढेही जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिल्यास आमदार, खासदार व मंत्री जिल्ह्याच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील. वडसा-गडचिरोली लोहमार्गासाठी राज्य सरकारने आपला ५० टक्के वाटा दिला. त्यामुळे पुढच्या पाच वर्षात हा मार्ग पूर्ण होईल. वनजमिनीवर अतिक्रमण करुन शेती कसणाऱ्यांना पट्टे देण्यासाठी ३ पिढ्यांची अट ठेवण्यात आली आहे. यापुढे ही अट रद्द करण्याचा प्रयत्न सरकार करेल, तसेच ओबीसी समाजाच्या पाठीशी सरकार उभे राहील. बेरोजगारी दूर करण्यासाठी पाचशे कोटी रुपये देऊन संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींना मिळणाऱ्या रकमेत चारशे रुपयांची वाढ करु, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले.
याप्रसंगी अशोक नेते यांनी भाजप सरकारने ओबीसींचे आरक्षण १९ टक्के पूर्ववत केल्याचे सांगितले. वडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग आपण मंजूर केला असून, आचारसंहिता संपल्यानंतर या लोहमार्गाचे काम सुरु होणार असल्याचे सांगितले. आपल्या लोकसभा मतदारसंघात आपण प्रयत्न केल्याने १३ हजार कोटींचे राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाल्याचे सांगून श्री.नेते यांनी नागभिड-नागपूर ब्रॉडगेजसाठी निधी खेचून आणल्याचे सांगितले. सिंचनासाठी ५ बंधारे आपल्याच प्रयत्नाने मंजूर झाल्याचेही श्री.नेते यांनी सांगितले. यावेळी अम्ब्रिशराव आत्राम, आ.संजय पुराम, प्रा.संतोष रामटेके, अरविंद कात्रटवार यांचीही भाषणेही झाली.
अमित शहा न आल्याने नागरिकांत नाराजी
आज दुपारी २ वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सभेला संबोधित करणार होते. त्यासाठी दुपारी १ वाजतापासूनच नागरिकांनी सभास्थळी भर उन्हात गर्दी केली होती. परंतु चार वाजूनही शहा यांचे आगमन झाले नाही. शेवटी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आले. त्यांनी अर्धा तास भाषण दिल्यानंतर पावणेपाच वाजता अमित शहा काही तांत्रिक कारणांमुळे येणार नसल्याचे सांगताच नागरिकांत नाराजी पसरली.