शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

शेतकरी, मजूर व महिलांना न्याय देण्यासाठी काँग्रेसला विजयी करा:खा.राजीव सातव

Saturday, 6th April 2019 06:08:23 AM

कुरखेडा,ता.६: शेतकरी, शेतमजूर व महिलांना न्याय देण्यासाठी राहुल गांधींना पंतप्रधान करायचे असून, त्यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे कांग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन अखिल भारतीय कांग्रेस कमिटीचे महासचिव खा.राजीव सातव यांनी आज येथे केले 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील कांग्रेस-राष्ट्रवादी-पिरिपा-शेकाप आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या प्रचारार्थ स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.

खा. सातव पुढे म्हणाले, छत्तीसगड, मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कांग्रेसने तेथील जनतेला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काँग्रेसला विजय मिळताच अवघ्या दोन दिवसांत  कर्ज माफ करून शेतकऱ्यांना न्याय दिला. त्याचप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत समाजातील प्रत्येक गोरगरीब कुटूंबाला वर्षाला ७२ हजार रुपये, कुटुंबातील महिला सदस्यांच्या बँक खात्यात दरमहा ६ हजार रूपये देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच राज्याच्या विधिमंडळ कांग्रेसचे उपगट नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात विदर्भाचा विकास करण्याचे आश्वासन देत लवकरच विजय वडेट्टीवाराना राहुल गांधीकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी सभेला मार्गदर्शन करताना कांग्रेसचे विधिमंडळ उपगट नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या खुमासदार शैलीत केंद्र व राज्य सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करीत केंद्र सरकारच्या उज्ज्वला व मुद्रा योजनेची खिल्ली उडवली. कांग्रेस सरकारच्या काळात मोठया प्रमाणात वनजमिनीचे पट्टे देण्यात आले. मात्र, मोदी, फडणवीस सरकारच्या काळात वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय सर्वोच न्यायालयाने दिला असून, तो या निवडणुकीनंतर अंमलात येऊ शकतो. यासाठी मोदी सरकार उलथून टाका व कांग्रेसच्या हातात सत्ता द्या, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले

याप्रसंगी राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनीही आपल्या भाषणात डॉ. नामदेव उसेंडी यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी मंचावर कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे संचालन तालुकाध्यक्ष जयंत हरडे यांनी, तर आभार प्रदर्शन मनोज अग्रवाल यांनी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
Q88K1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना