गडचिरोली | --°C | --°C |
चामोर्शी, ता.२: भाजप सरकारने गडचिरोली जिल्ह्यात अनेक रस्ते, पूल व अन्य विकासकामे करुन या जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. जिल्ह्याचा आणखी विकास करायचा असेल, तर पुन्हा भाजपलाच निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे भाजप-सेना-रिपाइं युतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ नगर पंचायत प्रांगणात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, अशोक नेते, आ.डॉ.रामदास आंबटकर, आ.डॉ.देवराव होळी, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, तालुकाध्यक्ष दिलिप चलाख, सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री.गडकरी पुढे म्हणाले, गडचिरोली जिल्हा श्रीमंत असूनही येथील नागरिक गरीब आहेत. वीज, पाणी व रस्ते नसल्याने येथे उद्योग येऊ शकले नाही. परंतु आता सरकारने या बाबींची पूर्तता करण्याकडे पाऊल उचलले आहे. भविष्यात नागपुरातील मेट्रो गडचिरोलीपर्यंत आणू, अशी ग्वाहीदेखील गडकरींनी दिली. शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी भीमा प्रजातीच्या बांबूची लागवड करावी, असा सल्लाही गडकरी यांनी दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.रमेश बारसागडे यांनी केले.