गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.११: लोकसभा निवडणुकीसाठी १८ मार्चपासून नामनिर्देशनपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. मात्र, ३ दिवस सुट्या असल्याने नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना केवळ पाच दिवस मिळणार आहेत.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की, १८ मार्चपासून नामनिर्देशनपत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अंतिम तारीख २५ मार्च ही आहे. मात्र, १८ ते २५ मार्च या कालावधीत ३ सुट्या आल्या आहेत. २१ मार्चला धुलीवंदन, २३ मार्चला दुसरा शनिवार व २४ मार्चला रविवार आहे. या तिन्ही दिवशी सुट्या असल्याने नामनिर्देशनपत्रे सादर करता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांना १८, १९, २०, २२ व २५ मार्च असे केवळ पाच दिवसच नामनिर्देशनपत्र सादर करता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप आपापल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. घोषणा करण्यास उशीर झाल्यास नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करणे आणि नंतर ती सादर करणे, यात उमेदवारांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.