गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.६ 'हे सरकार, माझं काय चुकलं?', असे म्हणून पश्चाताप करण्याची वेळ आज सामान्य माणसावर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि ओबीसी आरक्षणासारखा प्रश्न सोडवण्यासाठी गटातटाचे प्रस्थापित राजकारण सोडून एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले.
तालुक्यातील पोर्ला येथील श्रीगुरुदेव गणेश मंडळाद्वारा गावातील पोटेश्वर देवस्थानच्या यात्रेनिमित्त आयोजित सांस्कृतिक प्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापच्या महिला नेत्या जयश्री वेळदा, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सहचिटणीस होमराज उपासे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर, रोहिदास कुमरे, अर्चना चुधरी, विजया मेश्राम, माजी सरपंच परसराम बांबोडे,गुरुदेव किरणापुरे, मोरेश्वर ठाकरे, जीवन निकुरे, देविदास भोयर,अक्षय चापले,रवींद्र सेलोटे,रवींद्र पाल प्रामुख्याने उपस्थित होते.
भाई जराते पुढे म्हणाले, या जिल्ह्यात मोठ्या संख्येने ओबीसी, दलित, आदिवासी, भटके असताना राजकीय नेतृत्व मात्र दुसऱ्यांकडे आहे. परिणामी येथील विकासाला खीळ बसली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या झेंड्याखाली प्रबळ जनसंघटन निर्माण झाले, तरच पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर येथे सम्रूध्दी निर्माण करणे शक्य आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन पवन किरणापुरे यांनी केले.