गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता़.२८: गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांची काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदी फेरनियुक्ती केली आहे.
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा.के.सी.वेणुगोपाल यांनी डॉ.उसेंडी यांच्या फेरनियुक्तीचे पत्र काल(ता.२७) जारी केले. खा.वेणुगोपाल यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी पी.एन.पाटील व सरचिटणीसपदी राजाराम पाणगव्हाणे यांची नियुक्ती केली. सोबतच सात जिल्हाध्यक्षांचीही नियुक्ती केली आहे. त्यात केदार काळे(पालघर), अण्णासाहेब शेलार(अहमदनगर), डॉ.वसाहत मिर्झा(यवतमाळ), डॉ.नामदेव उसेंडी(गडचिरोली), संजय भोंडारे(हिंगोली), शेख मोईजुद्दिन नईमुद्दिन(लातूर शहर) व प्रकाश वाले(सोलापूर शहर) यांचा समावेश आहे.
२००९ ते २०१४ अशी पाच वर्षे डॉ.नामदेव उसेंडी काँग्रेसचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. पक्षाने त्यांना एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. परंतु त्यांना पराभूत व्हावे लागले. मात्र, ऑक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ.उसेंडी यांना विधानसभेचे तिकिट नाकारण्यात आले. त्यावेळी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर डॉ.नामदेव उसेंडी यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष बनविण्यात आले होते. तेव्हापासून ते आजतागायत जिल्हाध्यक्ष आहेत. काल त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली.
डॉ.नामदेव उसेंडी हे महिनाभरानंतर होणार असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी नुकतीच मुंबई व दिल्ली वारीही केली आहे. तसेच डॉ.उसेंडी यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी डॉ. नितीन कोडवते यांनीही मुंबई व दिल्लीला धडक देऊन आपली दावेदारी सादर केली आहे. अशातच दिल्लीस्थित पक्षाचे ज्येष्ठ नेते हे माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या नावाला अनुकूल असल्याच्या बातम्या येऊ लागल्याने उसेंडी यांनी शांत बसावे म्हणून त्यांना निवडणुकीपूर्वीच जिल्हाध्यक्षपद बहाल केले नसावे ना, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. येत्या पाच-सहा दिवसांत आचारसंहिता लागल्यानंतर काँग्रेस पक्ष कुणाला उमेदवारी देतो, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.