गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.११: ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी व त्यांचे कपात केलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात ओबीसी बांधवांनी इंदिरा गांधी चौकात दिवसभर धरणे आंदोलन केले.
राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. देशात गुरांची गणना होते;मात्र ओबीसींची गणना होत नाही, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत ओबीसी बांधवानी धरणे दिले. गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाजाला फक्त ६ टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यातच राज्यपालांच्या अधिसूचनेमुळे ओबीसींना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ओबीसींची जनगणना करावी व आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. आगामी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी ओबीसी समाजाची जनगणना न झाल्यास लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.
या आंदोलनात डॉ. नामदेव किरसान, प्रा. शेषराव येलेकर, शेमदेव चापले यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक केशव निंबोड, जी.के.बारसिंगे, गोपाल रायपुरे यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
देसाईगंज येथे एसडीएम कार्यालयावर धडक
देसाईगंज येथे आज ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन देण्यात आले. केंद्र व राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतरही ओबीसींची जनगणना करण्यात आली नाही. कमी आरक्षणामुळे समाजातील युवकांना विविध क्षेत्रात मागे राहावे लागत आहे. ओबीसी समाजाची जनगणना न झाल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आंदोलनात लोकमान्य बरडे, सागर वाढई, जि.प. सदस्य रमाकांत ठेंगरे, माजी उपसभापती नितीन राऊत, ग्रा. पं. सदस्य सुनील पारधी, चोपचे उपसरपंच कमलेश बारस्कर यांच्यासह ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.