गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.३: जिल्ह्यातील कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विधिमंडळात आवाज बुलंद करण्याची गरज असतांना दुर्दैवाने जिल्ह्यातील सध्याचे लोकप्रतिनिधी शेतीचे सिंचन, ओबीसींचे आरक्षण, युवकांचे रोजगार याविषयी न बोलता भांडवलदारांची चमचेगिरी करतात, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गडचिरोली विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात शेतकरी कामगार पक्ष उतरणार असून कार्यकर्त्यांनी त्यादृष्टीने विस्तार व पक्ष बांधणी करिता काम करावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले.
स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जयश्री वेळदा, महिला जिल्हा चिटणीस अर्चना चुधरी, विद्यार्थी जिल्हा चिटणीस अक्षय कोसनकर, गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, आरमोरी विधानसभा चिटणीस रोहिदास कुमरे, अहेरी विधानसभा चिटणीस नागेश तोर्रेम प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष विस्तार व कार्यपद्धती संबंधात आपले मत मांडून विविध सूचना केल्या. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व गावांमध्ये व शहरात बैठका घेऊन गावस्तरावरील शाखा व बूथ बांधणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
मार्गदर्शन करताना पुढे भाई रामदास जराते म्हणाले, शेकाप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे पक्षाचे काम पुढे चालविण्यात येणार असून, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा विरोधात शेकापची भूमिका असेल मात्र याचा अर्थ जिल्ह्यात शेकाप काँग्रेस सोबत आहे, असा समज कोणी करुन घेऊ नये, असा इशाराही भाई जराते यांनी दिला.
सभेला पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.