गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२२: नऊ महिन्यांपूर्वी ४० नक्षली ठार होण्यास कारणीभूत असल्याच्या संशयावरुन सशस्त्र नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील कसनासूर येथील तीन नागरिकांची हत्या केली. मालु दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी व लालसू मासा कुडयेटी अशी मृतांची नावे आहेत. तिघांचेही मृतदेह अगदी जवळ भामरागड-आलापल्ली मार्गावरील कोसफुंडी फाट्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले.
२२ एप्रिल २०१८ रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर-बोरिया जंगल तसेच राजाराम खांदला-नैनेर परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले होते. त्यात डीव्हीसी सिनू, त्याची पत्नी कमांडर शांता व पेरमिली दलम कमांडर तथा डीव्हीसी साईनाथ या प्रमुख व जहाल नक्षल्यांचा समावेश होता. या ४० नक्षल्यांच्या हत्येस उपरोक्त तिघेही कारणीभूत असून, त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यामुळेच ४० नक्षल्यांना जीव गमवावा लागला, त्यामुळे तिघांची हत्या केल्याचा उल्लेख नक्षलवाद्यांनी घटनास्थळाजवळ लावलेल्या बॅनरवर केला आहे. एप्रिल २०१८ मध्ये ४० नक्षली ठार झाल्याचा राग नक्षल्यांच्या मनात होता. त्याचा केव्हा ना केव्हा उद्रेक होईल, याची कल्पना सर्वांना होतीच. परंतु निष्पाप गावकऱ्यांना पोलिस संरक्षण देऊ शकले नाही. त्यामुळे तीन जणांना प्राण गमवावा लागल्याची टीका होऊ लागली आहे.
काय झाले नेमके?
आज तीन जणांची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर एक वेगळीच माहिती पुढे येत आहे. शुक्रवारी(ता.१८) शंभराच्या आसपास सशस्त्र नक्षलवादी कसनासूर गावात गेले होते. त्यांनी सर्वांना एकत्र बोलावून ४० नक्षल्यांचा बदला घेण्याची धमकी दिली. काही जणांच्या धान्याचीही नासधूस केली. त्यानंतर सोमवारी(ता.२१) गावातील काही वृद्ध नागरिक वगळता शंभराहून अधिक गावकऱ्यांनी आपले गाव सोडून ताडगाव येथील पोलिस मदत केंद्र गाठले. सध्या सर्वजण तेथेच आश्रयाला आहेत. विशेष म्हणजे, नक्षलवादी आपल्यासोबत दलसू देवू पुंगाटी, मुन्शी मडावी, विनू देवू तलांडी, मालू ढोगो मडावी, कन्ना रैनू मडावी व लालसू कुडयेटी या ६ जणांना घेऊन गेले होते. त्यातील तिघांची त्यांनी आज निर्घृण हत्या केली. उर्वरित तिघेजण नेमके कुठे आहेत, हे समजलेले नाही.
गगन्नाकडे सूत्रे आल्यानंतरचा जिल्ह्यातील पहिला मोठा हिंसाचार
ऑक्टोबर २०१८ अखेरपर्यंत मुप्पाला लक्ष्मणराव उर्फ गणपती याच्याकडे भाकप(माओवादी)च्या महासचिवपदाची सूत्रे होती.परंतु प्रकृती अस्वास्थाच्या कारणामुळे गणपतीने महासचिवपद सोडल्यानंतर जहाल नक्षली नंबाला केशव राव उर्फ गगन्ना उर्फ बसवराजू याची नियुक्ती करण्यात आली. नंबाला केशव राव हा अतिशय आक्रमक असल्याने आगामी काळात हिंसाचार बळावण्याची शक्यता नक्षलग्रस्त राज्यातील पोलिस व गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली होती. गगन्नाच्या नियुक्तीनंतर गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या हा पहिला मोठा हिंसाचार आहे. विशेष म्हणजे, दक्षिण गडचिरोलीवर कमांड असलेली जहाल नक्षली नर्मदाक्का हिलाही तीन महिन्यांपूर्वीच अबुझमाड भागात पाठविण्यात आले असून, आक्रमक नक्षल नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे नक्षलवादी आगामी काळात मोठा हिंसाचार घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आतापर्यंत ५१६ नागरिकांची निर्घृण हत्या
जिल्ह्यात नक्षल चळवळ सुरु झाल्यापासून आतापर्यंत नक्षल्यांनी ५१६ नागरिकांची निर्घृण हत्या केली आहे. पोलिस चकमकींमुळे नक्षल्यांची झालेली पिछेहाट, नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर करीत असलेले आत्मसमर्पण, यामुळे नक्षलवादी दिशाहीन झाले असून, त्यांनी दहशत निर्माण करुन आपले अस्तित्व दाखवून देण्याच्या हेतूने नैराश्यातून तिघांची हत्या करण्याचे निंदनीय कृत्य केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.