गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१६: संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने या परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी व्यापक आंदोलन उभे करण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाने घेतला आहे. त्याअनुषंगाने फेब्रुवारी २०१९ मध्ये गडचिरोली येथे विदर्भातील शेतकऱ्यांची दुष्काळ परिषद घेण्याचे पक्षाच्या मध्यवर्ती समितीने ठरविले आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक अलिबाग येथे ज्येष्ठ आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार भाई जयंत पाटील, आमदार भाई धैर्यशील पाटील, आमदार भाई पंडितशेठ पाटील, आमदार भाई बाळाराम पाटील, प्रवीणदादा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार व रविवार असे दोन दिवस घेण्यात आली. या बैठकीत शेकापचे गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी गडचिरोली जिल्ह्यातील धानाच्या नुकसानीबाबत मांडणी केली. तसेच जिल्ह्यातील मोठा रोजगार असलेल्या तेंदूपत्त्याचे दर सरकारच्या जीएसटीमुळे कमी झाल्याने रोजगार हिरावला गेल्याची परिस्थिती मांडून शेकापने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व धान उत्पादक ओबीसी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची विनंती केली. यावर या मध्यवर्ती समितीने फेब्रुवारीत विदर्भातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची गडचिरोली येथे दुष्काळ परिषद आयोजित करून सरकारला दुष्काळ निवारणासाठी सर्वंकष उपाययोजना करण्यास बाध्य करण्यात येईल, असा निर्णय घेतला. या दुष्काळ परिषदेला पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, सर्व आमदार, मध्यवर्ती समितीचे राज्यभरातील ३०० सदस्य व सुमारे १० हजार शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत आरमोरी विधानसभा चिटणीस रोहिदास कुमरे, ओबीसी जागृती अभियानाचे जिल्हा समन्वयक दिनेश बोरकुटे, चामोर्शी तालुका चिटणीस दिनेश चुधरी, दत्तू चौधरी सहभागी झाले होते.