गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१३: पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोलताना भाजपमधील भल्याभल्यांची बोबडी वळत असल्याच्या बातम्या आपण ऐकतो. मात्र, गडचिरोलीतील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने पाच राज्यांतील निवडणुकांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन थेट नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी करण्याची हिंमत केल्याने खळबळ माजली आहे.
प्रकाश अर्जुनवार यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी आपल्या फेसबूक अकाउंटवरुन केली आहे. श्री.अर्जुनवार हे निव्वळ मोदींचा राजीनामा करुन थांबले नाहीत; तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विकासपुरुष असल्याने त्यांना पंतप्रधान बनवावे, असेही त्यांनी सुचवले आहे. आज सकाळी फेसबूकवर ही पोस्ट येताच अर्जुनवार यांच्यावर भाजप समर्थकांनी प्रश्नांचा भडीमार करण्यास सुरुवात केली.
प्रकाश अर्जुनवार हे अनेक वर्षे काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ते भाजपात गेले. पक्षाने त्यांना जिल्ह्याचे उपाध्यक्षपदही दिले. अजूनही ते भाजपातच आहेत. पण, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होताच अर्जुनवारांनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. एका जिल्हा पातळीवरील आणि तेही दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्याने थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा प्रकार भाजप नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. शिवाय या प्रकारामुळे विरोधकांनाही आयते कोलित मिळाले आहे.