गडचिरोली | --°C | --°C |
कोरची, ता.१२: शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्यांसाठी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी आज तालुक्यातील ग्रामसभांनी येथील तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले.
-कोरची तालुका दुष्काळग्रस्त घोषित करुन आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, पीक विम्याची रक्कम देण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून सातबारा कोरा करण्यात यावा, शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, शेतकऱ्यांसाठी असलेल्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तत्काळ लागू करण्यात याव्यात, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यात यावा, नक्षल सप्ताहात आदिवासी बांधवांना विनाकारण पोलिस ठाण्यात बोलावून आठवडाभर ठेवले जाते, हा प्रकार त्वरित बंद करावा, आदिवासींवर लावण्यात येणारी ११० कलम रद्द करण्यात यावी, कोरची तालुक्यात जलसिंचनासाठी मोठे धरण नसल्याने शिवनाथ नदी व बेतकाटी-भिंमपुर नाल्यावरती उपसा सिंचन योजना सुरु करावी, तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावे, कोटगुल येथे ते ३० केव्हीचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, टिपागड पर्यटन स्थळी शासनाने अभयारण्यासाठी मंजूर केलेली योजना रद्द करण्यात यावी, कोरची तालुक्यातील आगरी, मसेली, झेंडेपार, नांदेडी, भरीटोला येथील प्रस्तावित लोहप्रकल्प खाणी रद्द करण्यात याव्यात इत्यादी मागण्यांसाठी आजचा मोर्चा काढण्यात आला. सुमारे ५७ मागण्यांचे निवदेन तहसीलदार पुष्पलता कुमरे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. दोन महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला. यावेळी हरिराम बागडेहेरिया, चमारू कल्लो, राजाराम नैताम, धनसिंग कल्लो, हरिराम कोल्हे, जयलाल कोडापे, रामू होळी,तानुराम पोरेटी, गोविंद सिंह होळी,बिरजु कमरो,छायाबाई उईके,मानबाई कुमरे, रेखाताई बोगा,पंजाबराव उईके,मीना हिळको,वनिता कुमरे, कचरीबाई काटेंगे,इंदल नैताम,गुलाब नैताम प्रतापगड, मनिराम परचो अडजाल, सुलतानाबाई पुडो यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा मोर्चा होता.