गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१३: केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी केलेली नोटाबंदी ही देशातील जनतेच्या हिताची नसल्याचा आरोप करुन आज युवक काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील इंदिरा गांधी चौकात निदर्शने करुन काळा दिवस पाळला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी केली. नोटाबंदीमुळे काळा पैसा देशाच्या तिजोरीत जमा होईल, असे सरकारने त्यावेळी सांगितले होते. परंतु आतापर्यंत सरकार काळा पैसा देशात परत आणू शकले नाही. नोटाबंदीमुळे अनेक उद्योग बंद पडले, व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. हजारो नागरिकांना बेरोजगार व्हावे लागले. एकंदरित हा निर्णय शेतकरी व सामान्य नागरिकांच्या हिताच्या विरोधात असल्याचा आरोप डॉ.नामदेव उसेंडी व युकाँच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याप्रसंगी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याचीही मागणी करण्यात आली.
या आंदोलनात काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, युवक काँग्रेसचे लोकसभाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, अमोल भडांगे, रजनीकांत मोटघरे, लहूजी रामटेके, रामदास टिपले, पी.टी.मसराम, वसंत राऊत, नंदू वाईलकर, जितेंद्र मुनघाटे, प्रतीक बारसिंगे, वासेकर, नंदू वाईलकर, राकेश गणवीर, तुळशीदास भोयर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.