गडचिरोली | --°C | --°C |
चामोर्शी, ता.१०: काँग्रेस व भाजपा हे बहुजनांचा राजा बळी यास लुबाडणाऱ्या बटू वामनाचे वंशज असून, सध्या मनुवादी व भांडवलदारांठी काम करुन सर्वसामान्य कष्टकरी जनतेला लुटण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या लबाडांना सत्तेतून हुसकावून लावण्यासाठी, तसेच कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी नागरिकांनी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन नि:स्वार्थपणे काम करावे, असे आवाहन शेकापचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले.
घारगाव येथील नवयुवक भाद्रपद गणेश मंडळाच्यावतीने बलिप्रतिपदेनिमित्त आयोजित दंडार प्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे गडचिरोली विधानसभा चिटणीस भाई नरेश मेश्राम होते. यावेळी महिला नेत्या जयश्री वेळदा, चामोर्शी तालुका चिटणीस भाई दिनेश चुधरी, दामोधर पाटील रोहनकर, प्रदीप आभारे, रमेश चौखुंडे, राजू केळझरकर, धनराज वासेकर, प्रकाश सहारे, सरपंच सुषमा आभारे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नवयुवक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.