गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१७: धान व कापसाचे पीक अंतिम टप्प्यात असताना दोन्ही पिकांना शेवटचे पाणी देणे आवश्यक आहे. मात्र, शासनाने भारनियमन सुरु केल्याने पीक हातातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ भारनियमन बंद करावे;अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकू, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
शेकापच्या नेत्या जयश्री वेळदा यांच्या नेतृत्वात आज पक्षाचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, धान व कापूस पीक अंतिम टप्प्यात आहे. हा कालावधी पिकाला पाणी देण्याचा आहे. परंतु पहाटेपासून दिवसभर १२ ते १४ तास भारनियमन करण्यात येत असल्याने पीक वाचविणे कठीण झाले आहे. रात्री वीज आल्यानंतर पाणी देताना साप, विंचू चावून वा हिंस्त्र पशूंनी हल्ला केल्यास शेतकऱ्याचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी महावितरण जबाबदारी स्वीकारणार काय, असा सवाल जयश्री वेळदा यांनी केला आहे. भारनियमन तत्काळ बंद न केल्यास पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा जयश्री वेळदा यांनी दिला.
शिष्टमंडळात शेकापचे गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, आरमोरी विधानसभा चिटणीस रोहिदास कुमरे, पुरोगामी महिला संघटनेच्या जिल्हा चिटणीस अर्चना चुधरी, पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा चिटणीस अक्षय कोसनकर, पुष्पा कोतवालीवाले, विजया मेश्राम, प्रिया कुमरे, ओबीसी जागृती अभियानाचे जिल्हा समन्वयक दिनेश बोरकुटे, श्रीधरराव मेश्राम, विनायक भोयर आदींचा समावेश होता.
निवेदनावर दिनेश चुधरी, सुधाकर आभारे, रोशन नरुले, ज्ञानेश्वर गुरनुले, टिकाराम निलेकार, विनोद शिदेकार, विलास सेलोटे, सचिन आत्राम, वासुदेव मेश्राम, भैयाजी वाडगुरे, बाबूराव जेंगठे, किशोर डांगे, नंदा मोगरे, लक्ष्मी डांगे, प्रियदर्शिनी सातपुते, मुखरु दिवटे, हरिश्चंद्र म्हशाखेत्री, रघुनाथ पाल, शंकर झाडे, दामोधर रोहनकर, होनाजी हुलके, दीपक येनप्रेड्डीवार, सुरेश झरकर, विनोद देशमुख, रवींद्र देशमुख, डंबाजी हजारे, सुरेश येलपूरवार, विकास, दीपक आल्लूरवार, मुकेश्वर चुधरी, विलास वरखडे, बालाजी मेश्राम, राम भोयर, रवींद्र मानकर, रंजित बावणे, हरिदास जुमनाके यांच्यासह भेंडाळा, फराडा, रामाळा, मोहुर्ली, खंडाळा, दोटकुली, कृपाळा, मरेगाव, भिकारमौशी, दिभना, गुरवळा इत्यादी गावांतील कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.