गडचिरोली, ता़२४
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महावितरणने आता विद्युत सहायकांची भरती प्रक्रिया दहावीतील ‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ ऐवजी ‘एकूण सरासरी गुणांच्या आधारे’ राबविण्याचे ठरविले आहे़यामुळे विद्युत सहायक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी दहावीतील आपल्या एकूण सरासरी गुणांची टक्केवारी महावितरणच्या संकेतस्थळावरील लिंकद्वारे दिलेल्या प्रणालीवर नोंदवावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे़
काही दिवसांपूर्वीच महावितरणने सुमारे ६५०० विद्युत सहायकांची भरती करण्याची प्रक्रिया आरंभिली होती़ ही प्रक्रिया ‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ या निकषानुसार राबविण्यात येत होती़ परंतु ही पद्धत जुनी दहावी झालेल्यांच्या दृष्टीने योग्य नसल्याची भूमिका घेऊन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती़ या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार आता ही प्रक्रिया दहावीतील ‘एकूण सरासरी गुणांच्या आधारे’ राबविण्यात येणार आहे़ यासाठी महावितरण कंपनीच्या डब्लूडब्लूडब्लू महाडिस्काम डॉट इन संकेतस्थळावर जाऊन उमेदवार त्यांच्या आॅनलाईन अर्जाचा नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून सादर केलेल्या आॅनलाईन अर्जामधील सर्व विषयांमध्ये मिळालेले गुण व एकूण गुण यामध्ये योग्य तो बदल करू शकतात़
हा बदल करण्यासाठी २५ आॅक्टोबरपासून २ नोव्हेंबरपर्यंत कंपनीच्या संकेतस्थळावर संबंधित लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे़ त्यानंतर उमेदवाराला कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही़