गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

महाराष्ट्राला 'मनरेगा' चा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, गडचिरोली जिल्हाही सन्मानित

Tuesday, 11th September 2018 06:34:52 AM

नवी दिल्ली, ११ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी आज केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्राला विविध श्रेणीत चार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आज केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)' पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध श्रेणीत एकूण २३७ पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास राज्य मंत्री राम कृपाल यादव, सचिव अमरजीत सिन्हा व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी 'जलयुक्त शिवार' व 'मागेल त्याला शेततळे' या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला आज पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

रोजगार हमी योजना आयुक्त ए.एस.आर. नायक, रोहयो उपसचिव प्रमोद शिंदे व कमलकिशोर फुटाणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

रोजगार हमी विभागाने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये नैसर्गीक स्त्रोतांचे व्यवस्थापनांतर्गत एनआरएममध्ये एकूण ७० हजार ५१४ कामे पूर्ण केली आहेत. यासाठी १४५१.७४ कोटींचा व्यय झालेला आहे. एनआरएम अंतर्गत राज्य शासनाची महत्वाकांक्षी 'जलयुक्त शिवार योजना' व 'मागेल त्याला शेततळे' या योजना राबविण्यात आल्या व या माध्यमातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. 

एनआरएम अंतर्गत १४५१ कोटींची प्रमुख कामे

राज्यात नैसर्गिक स्त्रोतांचे व्यवस्थापन (एनआरएम) अंतर्गत झालेल्या १४५१ कोटींच्या प्रमुख कामांवर एक दृष्टीक्षेप :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावळ यांनी २ आक्टोबर २०१८ रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना जाहीर केली. कृषी व वन विभागाला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीचे अधिकार दिले व त्याकरिता प्रमुख ११ योजना जाहीर केल्या, त्यामधील कृषी व जलसंधारणविषयक कामाच्या प्रमुख योजनांमध्ये 'अहिल्यादेवी सिंचन विहीर' योजनेंतर्गत १ लाख १० विहिरी घेण्यात आल्या, त्यामधून ५ लाख एकर संरक्षित सिंचन तयार झाले. 'कल्पवृक्ष फळबाग योजने' मध्ये ७८ हजार एकरवर फळबाग लागवड करण्यात आली. नरेगातून अंकूर रोपवाटिकेची कामे हाती घेण्यात आली. यांतर्गत ९ कोटी रोपे तयार करण्यात आली, यामाध्यमातून राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेस बळकटी मिळाली.

नंदन वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत ८ लाख रोपांची लागवड करण्यात आली, अशाप्रकारे नैसर्गिक साधन संपत्तीविषयक कामांवर एकूण १४५१ कोटी रुपये खर्च करण्यात आले .  

गडचिरोली जिल्ह्याचा सन्मान 

गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे. या जिल्ह्यास याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.  रोजगार हमी आयुक्त तसेच गडचिरोली जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, सध्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, उपायुक्त के.एन.राव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जयंत बहरे, गटविकास अधिकारी एस.पी. पडघन यांनी पुरस्कार स्वीकारला. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये ८ हजार ८९४ कामांना सुरुवात झाली. यातून दोन वर्षात ३९.१२ लाख मनुष्य दिन रोजगार निर्मिती झाली. विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या नेतृत्वात या आदिवासीबहुल जिल्हयामध्ये मनरेगाअंतर्गत वैयक्तिक कामांवर भर देण्यात आला. जिल्हयात शेततळे, सिंचन विहीर, वर्मी कंपोस्ट आदी ६ हजार ७५० कामे पूर्ण झालेली आहेत..

नगरी ग्रामपंचायतीचा सन्मान

मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्हयातीलच गडचिरोली ब्लॉक मधील 'नागरी ग्रामपंचायती' ला गौरविण्यात आले. सरपंच अजय मशाखेत्री आणि ग्रामसेवक राकेश शिवणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या ग्रामपंचायतीने एनआरएमची विक्रमी ३८ कामे पूर्ण केली. यामाध्यमातून गावात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती झाली.

 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
GSSAR
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना