मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

ओबीसी आरक्षण कपातीचा मुद्दा विधिमंडळात मांडणार:शेकापचे आ.जयंत पाटील यांची ग्वाही

Sunday, 9th September 2018 02:12:44 AM

गडचिरोली, ता.८: देशात आणीबाणीसारखी परिस्थिती असून, संविधान बदलून गोरगरीब बहुजनांची मुले शिकूच नये, अशी व्यवस्था लादण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रयत्न हाणून पाडा, असे सांगत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण कपातीचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करु, अशी ग्वाही दिली.

शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा शाखेच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे मुंबई प्रदेश चिटणीस अॅड.राजेंद्र कोरडे हे होते. यावेळी शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, जिल्हा सहचिटणीस जयश्री वेळदा, दिलीप नानवटे, मिलिंद कांबळे, मिलिंद पौनीपगार, महादेव शिरसाट, राहुल थूल, सुदर्शन गोडघाटे,  गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, आरमोरी विधानसभा चिटणीस रोहिदास कुमरे, गडचिरोली तालुका चिटणीस सुधाकर आभारे, चामोर्शी तालुका चिटणीस दिनेश चुधरी, पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा चिटणीस अक्षय कोसनकर, दादाजी कुकडे उपस्थित होते.

आ.जयंत पाटील म्हणाले, स्वातंत्र्यानंतर या देशावर उच्चवर्णीय व भांडवलदारांचं वर्चस्व राहिलं आहे. परंतु महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाने त्यांच्या व्यवस्थेला पहिल्यांदा तडा दिला. १९९० पर्यंत राज्याच्या विधानसभेत शेतकरी कामगार पक्षाचा विरोधी पक्षनेता असायचा. आम्ही फुले-आंबेडकरी तत्वज्ञान मानणारे लोक आहोत. आमच्या मंडळींनी सत्यशोधक चळवळीत सहभाग घेतला. १९३२ ते १९३७ पर्यंत चाललेला शेतकऱ्यांचा पहिला संप माझ्या आजोबांच्या नेतृत्वात झाला. शेकापच्या लढ्यामुळेच सर्वप्रथम कुळ कायदा लागू झाला. सत्तत असताना रोजगार हमी कायदा बनवून त्याची अंमलबजावणी करणारा पक्ष शेकाप होय. आमच्या पक्षात आमदारकी मिरवणारे लोक नाहीत. आम्ही पोलिस संरक्षण घेत नाही. रायगड जिल्ह्यात पूर्वी सहकारी बँक व सहकारी संस्थांवर काँग्रेसची मक्तेदारी होती. आता त्या सर्व शेकापच्या ताब्यात आहेत. त्या भागात १७ हजार बचत गट शेकापचे आहेत, अशी माहिती आ.जयंत पाटील यांनी दिली.

देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. संविधान बदलण्याच्या गोष्टी सुरु आहेत. बहुजनांची मुले शिकूच नयेत, अशी व्यवस्था निर्माण केली जात आहे. हे हाणून पाडण्याची वेळ आली आहे. विदर्भ हा बहुजनांचा आहे. परंतु राज्य भांडवलदारांचं आहे. यापुढच्या निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातील जनतेने एकदा शेकापच्या उमेदवाराला संधी द्यावी, असे आवाहन आ.पाटील यांनी केले.

व्ही.पी.सिंग यांनी मंडल आयोग लागू करुन ओबीसींना आरक्षण दिले. परंतु भाजपने त्यांचं सरकार पाडलं. ओबीसींना गडचिरोली जिल्ह्यात १९ टक्के आरक्षण असतानाही केवळ ६ टक्के आरक्षण दिले जात आहे. ही बाब गंभीर असून, हा प्रश्न विधिमंडळात उपस्थित करु, तसेच मच्छिमार समाजाला तलाव व बोड्यांचे मालकी हक्क मिळावेत, यासाठीही सरकारशी संघर्ष करु, अशी ग्वाही आ.जयंत पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. त्यामुळे धानाला साडेतीन हजार रुपये भाव द्यावा, ही मागणी रास्त असून त्यासाठीदेखील आपण सरकारला जाब विचारु, असे आ.पाटील यांनी सांगितले. 

यावेळी पक्षाचे मुंबई प्रदेश चिटणीस अॅड.राजेंद्र कोरडे यांनी ओबीसी आरक्षण वाढविण्याची मागणी केली. देशात चातुर्वर्ण्य व्यवस्था लादण्याचा प्रयत्न होत आहे. तो हाणून पाडण्यासाठी शेकापने 'मनुस्मृती हटाव, देश बचाव', हा नारा दिला आहे. शेकाप हा अभ्यासू व सिद्धांतवादी लोकांचा पक्ष असून, आज सरकार या पक्षाच्या आमदारांचे मत विचारात घेतल्याशिवाय निर्णय घेत नाही, असे अॅड.कोरडे यांनी सांगितले.

पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी ओबीसींचे कपात केलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, मच्छिमारांना तलाव व बोड्यांचे मालकी हक्क द्यावे, धानाला साडेतीन हजार रुपये हमीभाव द्यावा, सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करावे इत्यादी प्रश्न मांडले. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन भाजपचे लोक जिंकले. परंतु चार वर्षांच्या काळात त्यांनी आरक्षणाचा मुद्दा सोडविला नाही. तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही हे सरकार देऊ शकत नाही, अशी टीका जराते यांनी केली.

कार्यक्रमाचे संचालन जयंत निमगडे, तर आभार प्रदर्शन सुधाकर आभारे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शामसुंदर उराडे, भक्तदास कोठारे, नानाजी काळबांधे, मारोतराव वैरागडे,एकनाथ रोहनकर,रोशन नरुले, विठ्ठल दुधबळे, विनोद मेश्राम, श्रीधर मेश्राम आदींनी सहकार्य केले.

पहिल्याच वेळी प्रचंड प्रतिसाद

निर्धार मेळाव्यापूर्वी शेकापच्या आठवडी बाजारचौकानजीकच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आ.जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. तेथून कार्यक्रमस्थळापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत आणि मेळाव्यात दोन ते अडीच हजार लोकांनी हजेरी लावली होती. जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाची स्थापना होऊन अवघे ४ महिने झाले असताना नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याने विरोधी पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VIDIK
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना