गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.७: २०१४ च्या निवडणुकीत जनता भ्रष्टाचार, महागाई व बेरोजगारीला कंटाळली होती. त्यामुळे आश्वासक चेहरा म्हणून जनतेने मोदींना संधी दिली. त्याच भूमिकेतून शिवसेनेने मोंदीना पसंती दिली होती. परंतु आता मोदी लाट ओसरली असून, भाजपची सर्वत्र घसरण सुरु झाली आहे, अशी टीका शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख खा.गजाजन किर्तीकर यांनी आज येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली.
याप्रसंगी रामटेकचे माजी खासदार प्रकाश जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र संघटक अशोक धापोळकर, महिला आघाडीप्रमुख छाया कुंभारे, जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार, जिल्हाप्रमुख विजय शृंगारपवार, माजी जिल्हाप्रमुख हरीश मने, माजी चंद्रपूर जिल्हाप्रमुख अजय स्वामी, उपस्थित होते. खा. किर्तीकर म्हणाले, २०१४ च्या सुमारास देशातील जनता काँग्रेसचा भ्रष्टाचार, महागाई व बेरोजगारीला कंटाळली होती. त्यामुळेच जनतेने एक आश्वासक चेहरा म्हणून नरेंद्र मोदींना संधी दिली. शिवसेनेने तेव्हा भाजपला नव्हे; तर मोदींना साथ दिली. परंतु चार वर्षाच्या कार्यकाळात जनतेचा अपेक्षाभंग झाला. नोटाबंदीचा महाभयावह निर्णय घेतला. परकीय शत्रूकडून जसे आक्रमण होते;तसाच हा निर्णय होता. नोटाबंदीमुळे देशाच्या तिजोरीत काळा पैसा आला नाही, अतिरेकी कारवाया थांबल्या नाहीत. उलट उद्योगधंदे बंद झाले, महागाई आणि बेकारी बाढली, अशी टीका खा.किर्तीकर यांनी केली. एकूणच देशातील वातावरण बघता भाजपबद्दल लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. आता मोदी लाट ओसरली असून, भाजपची सर्वत्र घसरण सुरु झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे खा.किर्तीकर यांनी सांगितले.
आपण ८ वर्षे या जिल्ह्याचे प्रभारी व ४ वर्षे पालकमंत्री होतो. त्यामुळे येथील जनतेशी आपले जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत, असे सांगून खा.किर्तीकर यांनी या जिल्ह्यातील एक लोकसभा व आरमोरी आणि गडचिरोली या दोन विधानसभा क्षेत्रात शिवसेना ताकदीने लढेल आणि मागील विधानसभा निवडणुकीतील मतदान बघता आमचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.पूर्व विदर्भातील ६ लोकसभा व ३६ विधानसभा क्षेत्रांमध्ये शिवसेना मुळापासून पक्षबांधणी करीत असून, कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे, पक्षातील त्रुटी दूर करणे इत्यादी कामे सुरु असल्याची माहिती खा.किर्तीकर यांनी दिली. चार राज्यांमध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यात पराभव डोळ्यासमोर असल्याने भाजपने एकत्र निवडणुका घेण्याचा प्रयत्न करुन पाहिला, असे टीकास्त्र खा.किर्तीकर यांनी सोडले.