गडचिरोली, ता २४
गडचिरोली जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मागासलेला असून, येथील युवतींना परिचारिकेचे शिक्षण घेणे हे केवळ दिवास्वप्नच असायचे़ होतकरू युवतींची ही इच्छा पूर्ण करण्याचे काम आयुर्वेद उत्कर्ष मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे़ डॉ़ प्रमोद साळवे यांनी १९८२ मध्ये नागपुरात या मंडळाची स्थापना केली़ स्वत: आयुर्वेदशास्त्रात डॉक्टर असलेल्या प्रमोद साळवे यांनी सुरुवातीला नागपुरातील झोपडपट्टी भागात आरोग्य सेवा दिली़ मात्र, शहरापेक्षा ग्रामीण आणि आदिवासी भागात सेवा करण्याचे समाधान डॉ़साळवे यांना हवे होते़ त्यामुळे त्यांनी आपले ज्ञान आणि सेवावृत्तीचा उपयोग गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्याच्या विकासासाठी करायचे ठरविले़ २७ जून १९९६ मध्ये त्यांनी धानोरा तालुक्यातील चातगाव या आदिवासीबहुल खेड्यात आरोग्य सेवा केंद्र सुरू करून लोकांवर औषधोपचार केला़ लोकांनी त्यांच्या सेवेचे कौतूक केले आणि बघताबघता चातगाव परिसरातील दुर्गम गोडलवाही, पेंढरी, रांगी, येरकड इत्यादी भागातील रुग्ण डॉ़ साळवे यांच्या आरोग्यसेवेचा लाभ घेण्यासाठी येऊ लागले़ अशातच या भागात शैक्षणिक सुविधांचा अभाव असल्याचे लक्षात येताच त्यांनी धानोरा तालुक्यातील दुधमाळा येथे माध्यमिक विद्यालय सुरू केले़ त्यानंतर आदिवासी संस्कृतीत महिलांना विशेष महत्त्व असल्याने महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी परिचारिकेचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला़ त्याअनुषंगाने चातगाव येथे डॉ़ साळवे नर्सिंग कॉलेजची निर्मिती करून २००५ मध्ये सर्वप्रथम जीएनएम आणि एएनएम अभ्यासक्रम युवतींसाठी सुरू केला़ प्रशिक्षित अध्यापक, प्रयोगशाळा, वाचनालय, प्रशस्त इमारत आणि वसतिगृहाची सोय अशा सुविधांमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागासह अन्य जिल्ह्यांतील युवतीही येथे परिचारिकेचे प्रशिक्षण घेण्यासाठी गर्दी करू लागल्या़ आज येथील उत्तीर्ण विद्यार्थिनी नागपूर, मुंबई, रायपूर इत्यादी मोठ्या शहरात नामांकित इस्पितळांमध्ये सेवा देत आहेत़ काही विद्यार्थिनी शासकीय सेवेत लागल्या असून, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ साळवे नर्सिंग कॉलेजने दिले आहे़ केवळ ११ विद्यार्थिनींवर सुरू झालेल्या या कॉलेजमध्ये आजमितीस २२० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत़ यंदा बीएससी नर्सिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून, पुढच्या सत्रापासून त्याचा प्रारंभ होणार आहे़
डॉ़ प्रमोद साळवे यांनी केवळ रोजगारच दिला नाही, तर नर्सिंगचे शिक्षण दिल्याने समाजातील कुपोषण आणि अंधश्रद्धा दूर करण्याचे काम केले आहे़ वेळोवळी रॅली काढून आणि शिबिरे घेऊन आरोग्यविषयक जनजागृती करण्याचे कामही डॉ़प्रमोद साळवे यांचे नर्सिंग कॉलेज करीत आहे़ त्यांचे हे कार्य म्हणूनच समाजात उल्लेखनीय आहे़