गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२१: मागील दोन दिवसांपासून जिल्हाभर मुसळधार पाऊस कोसळल्याने कोरची, कुरखेडा, आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांतील घरे क्षतिग्रस्त झाली आहेत. यामुळे गोरगरीब नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन शासनाला अहवाल सादर करावा, असे निर्देश आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत.
मागील दोन दिवस सर्वत्र संततधार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामुळे कित्येक गावांतील नागरिकांची घरे क्षतिग्रस्त झाली. शेतीलाही मोठा फटका बसला. आ.गजबे यांनी काही गावांची पाहणी केली असता त्यांना अनेक घरे, गुरांचे गोठे क्षतिग्रस्त झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांशी संवाद साधून पंचनामा करण्याचे निर्देश दिले. पंचनामा करण्याची प्रक्रिया ताबडतोब राबवून शासनाला अहवाल सादर करावा व आपद्गस्तांना भरपाई दयावी, असे आ.कृष्णा गजबे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. आ.गजबे यांच्या निर्देशानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.