गडचिरोली | --°C | --°C |
चामोर्शी, ता.४: स्वच्छ भारत अभियानांतर्गत येनापूर परिसरातील नागरिकांनी सरकारी योजनेतून शौचालय बांधून वर्ष उलटले तरी लाभार्थींना बांधकामाची रक्कम न मिळाल्याने त्यांच्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी नुकताच चामोर्शी तालुक्यातील येनापूर, गौरीपूर, आंबोली, वायगाव, चांदेश्वर, राजगोपालपूर, प्रियदर्शनी, रवींद्रपूर, कन्हाळगाव इत्यादी गावांचा दौरा करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी शौचालय बांधकामाचे पैसे न मिळाल्याचे सांगितले. भारत स्वच्छ अभियान योजनेंतर्गत अनेक नागरिकांनी आपल्या घरी शौचालयाचे बांधकाम केले. परंतु दहा-बारा महिने लोटूनही आपणास रक्कम मिळाली नाही. आपण कर्ज काढून वा पदरमोड करुन शौचालयाचे बांधकाम केले. काही जणांनी रोवणीचे पैसेही शौचालय बांधकामात खर्च केले. परंतु केंद्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आपणास पैसे मिळण्यास विलंब होत आहे. परिणामी आपणावर आर्थिक संकट कोसळले आहे, अशी आपबिती गरीब लाभार्थींनी डॉ.नामदेव उसेंडी यांना सांगितली.
केंद्र सरकारने महिनाभराच्या आत लाभार्थींना शौचालय बांधकामाची रक्कम न दिल्यास काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा डॉ.उसेंडी यांनी दिला आहे. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद खोबे, नीळकंठ निखाडे, विश्वास बोरकंठीवार, नरेश बहादूर, डॉ.कोडापे, मोरेश्वर एडलावार, अरुण कुकडकर, ताराचंद लाकडे, साईनाथ आत्राम, महेंद्र बॅनर्जी, कृष्णा मंडल, अशोक मंडल, आशिष मिस्त्री, आनंदराव कोवासे, दिनानाथ मंडल व परिसरातील नागरिक उपस्थित होते.