गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.३१: शेतकरी कामगार पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन १ व २ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांच्या नेतृत्वात आज गडचिरोली जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते रवाना झाले.
शेकापच्या औरंगाबाद येथील अधिवेशनाला पक्षाच्या नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, भाकप नेते डी.राजा मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनासाठी शेकापच्या दीडशे कार्यकर्त्यांचा जत्था आज गडचिरोलीतून औरंगाबादकडे रवाना झाला. तत्पूर्वी प्रेस क्लब भवन येथे पक्षाचे जिल्हास्तरीय अधिवेशन घेण्यात आले. भांडवलदारांची चाटूगिरी करून सरकार जनहितविरोधी धोरण राबवीत असून, शेतकरी, कष्टकरी व कामगारांना जेरीस आणले आहे. सरकारच्या जनहितविरोधी भूमिकेच्या विरोधात एकत्र येऊन सामान्य जनतेचे राज्य साकारण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी यावेळी केले.
अध्यक्षस्थानी शामसुंदर उराडे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा चिटणीस रामदास जराते,सहचिटणीस जयश्री वेळदा,रोहिदास कुमरे,पूरोगामी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा चिटणीस अक्षय कोसनकर, नरेश मेश्राम, अर्चना चुधरी, हरिदास गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.
सध्याचे सरकार जातीय व धार्मिक तणाव निर्माण करून मते मिळविण्याच्या प्रयत्नात असून जिल्ह्यातील आदिवासी,दलित,भटके विमुक्त आणि ओबीसींनी शेकापच्या लाल झेंड्याखाली एकत्र येऊन हक्क आणि अधिकारासाठीचा सरकार विरोधातील लढा तीव्र करावा, अशी अपेक्षाही भाई रामदास जराते यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ अदा करावी, धानाला साडेतीन हजार रूपये हमीभाव जाहिर करावा, कंत्राटी कर्मचा-यांना कायमस्वरूपी सामावून घ्यावे असे ठरावही या अधिवेशनात पारित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिदास कुमरे, तर संचालन श्रीधर मेश्राम यांनी केले.