गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२८: गृह विभागाने काल(ता.२७) राज्यातील १२० वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोलीचे सध्याचे पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक म्हणून स्थानांतरण करण्यात आले आहे.
डॉ.अभिनव देशमुख हे १५ जून २०१६ रोजी गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाले होते. आपल्या २५ महिन्यांच्या कालावधीत डॉ.देशमुख यांनी फार गाजावाजा न करता अनेक मोठ्या कारवाया करुन नक्षल चळवळ खिळखिळी केली. त्यांच्या कार्यकाळात ५० हून अधिक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले. यंदा ९ फेब्रुवारी रोजी नक्षल चळवळीतील फार जुना सदस्य व नक्षल्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख रामन्ना व त्याची पत्नी पद्मा उर्फ समाक्का कोडापे यांना पोलिसांनी बल्लारपूर परिसरातून अटक केली होती. हे डॉ. देशमुख यांच्या कार्यकाळातील मोठी उपलब्धी होती. शिवाय यंदा २२ एप्रिल रोजी कसनासूर परिसरात झालेल्या चकमकीत पोलिसांनी तब्बल ४० नक्षल्यांना कंठस्नान घातल्याने देशभरातून गडचिरोली पोलिसांचे कौतूक झाले. या घटनेपूर्वीही डॉ.देशमुख यांच्या नेतृत्वात कल्लेड व अन्य ठिकाणच्या चकमकीत २० हून अधिक नक्षली ठार झाले आहेत. आता डॉ.देशमुख यांची बदली कोल्हापूरला झाली आहे. गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. तेथील पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांची मुंबई पोलिस उपायुक्त म्हणून स्थानांतरण झाले आहे. अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक ए.राजा यांची उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.
गडचिरोलीचे नवे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे हे नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांच्या अर्धांगिणी कादंबरी बलकवडे ह्या गोंदियाच्या जिल्हाधिकारी आहेत.