गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.२७: हिंसाचाराद्वारे गोरगरीब नागरिकांना वेठीस धरणाऱ्या नक्षल्यांविरोधात आवाज तीव्र करीत आज कारवाफा येथे शेकडो नागरिकांनी पोलिस बंदोबस्तात एकत्र येत नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य जोगन्ना याचा पुतळा जाळून रोष व्यक्त केला.
२८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षलवादी दरवर्षी शहीद सप्ताह साजरा करुन मृत नक्षल्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. या सप्ताहात हिंसक कारवायाही केल्या जातात. परंतु नक्षल्यांना कुणी सहकार्य करु नये, यासाठी कारवाफा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या जनमैत्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला दुर्गम भागातील शेकडो आदिवासी नागरिक उपस्थित झाले होते. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन नागरिकांना नक्षल्यांचा विरोध करण्याचे आवाहन केले.
नक्षल्यांनी आजवर खोट्या क्रांतीची स्वप्ने दाखवून आदिवासींची दिशाभूल केली आहे. नक्षलवादी हे विकासातील अडथळा असून, आदिवासींचा विकास लोकशाहीच्या मार्गानेच होऊ शकतो, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर नागरिकांनी आपल्या रागाला वाट मोकळी करुन देत जहाल नक्षली व विभागीय समितीचा सदस्य जोगन्ना उर्फ घिसू उर्फ चिमाला नरसय्या याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी नागरिकांनी नक्षल विरोधात गगनभेदी घोषणाही दिल्या.
नक्षल्यांच्या हिंसक क्रांतीमुळे आदिवासींचे केवळ नुकसान झाले असून, त्यांच्या कार्यप्रणालीच आदिवासी हिताच्या कोणत्याही योजना नाहीत. आतापर्यंत ७०० हून अधिक आदिवासींची हत्या नक्षल्यांनी केली आहे. त्यामुळे जनतेचा विकास केवळ लोकशाहीच्या मार्गानेच होणे शक्य आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.