गडचिरोली | --°C | --°C |
कुरखेडा,ता.१९: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कुरखेडा येथील जिल्हा परिषद लघु सिंचन उपविभागामार्फत बांधण्यात आलेला चिरचाडी येथील कोल्हापुरी बंधारा पहिल्याच पावसात वाहून गेल्याने शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. यामुळे सिंचन विभागाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यातील चिरचाडी गावालगत असलेल्या नाल्यावर २००७ मध्ये कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला होता. या जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे नुतनीकरण करून नवीन पद्धतीने २०१८ मध्ये कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. बंधारा बांधताना नाल्याच्या एकाच बाजूला सिमेंट काँक्रिटची संरक्षक भिंत बांधण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला दगडाची पिचिंग करण्यात आली. तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने दगडाची पिचिंग पार उखडून गेली आणि बंधाऱ्याच्या एक भाग पाण्यात वाहून गेला. बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने पहिल्याच पावसात हा बंधारा वाहून गेला. परिणामी शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या बांधकामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सिंचन विभागाच्या वतीने सन २०१७-१८ या वर्षात महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत कुरखेडा व कोरची तालुक्यातील २३ माजी मालगुजारी तलावांमधील गाळ उपसण्याचे काम करण्यात आले. या प्रकरणात इंधनावर बेसुमार खर्च दाखवून शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला. शिवाय कामही दर्जेदार झाले नाही. या प्रकरणात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांच्यावर आर्थिक गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेऊन राज्य शासनाने त्यांना नुकतेच निलंबित केले आहे. ही बातमी ताजी असतानाच ठिकठिकाणी बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांच्या कामात अजिबात सुधारणा झालेली नाही.