गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१२: अचानक प्रवाह वाढल्याने दोन नागरिकांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याच्या वेगवेगळ्या घटना काल(ता.११)संध्याकाळी अहेरी तालुक्यातील किष्टापूर निलमगुडम येथे घडल्या. नागेश मलय्या कावरे(२२),रा.कोत्तागुडम व मल्लेश पोचालू भोयर(५५)रा.पुसुकपल्ली अशी मृतांची नावे आहेत.
गेल्या तीन-चार दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस पडत असल्याने नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. जिमलगट्टा गावापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेला किष्टापूर नाल्यालाही पूर आला आहे. अशातच काल नागेश हा आपल्या भावासह शेतावर गेला होता. संध्याकाळी गावाकडे परत जाताना दोघेही नाला पार करीत होते. परंतु अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यातून नागेशचा भाऊ कसाबसा बाहेर पडला. मात्र, नागेश पुरात वाहून गेला.
दुसरी घटना निलमगुडम येथे घडली. मल्लेश भोयर हा काल संध्याकाळी शेतावरुन गावाकडे परत जात असताना वाटेतील निलमगुडम नाला पार करु लागला. मात्र, प्रवाह वाढल्याने मल्लेश पुरात वाहून गेला. दोन्ही घटनांविषयी पोलिस व महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. गावकऱ्यांच्या मदतीने दोघांच्याही मृतदेहांचा शोध सुरु आहे.