गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली, ता.१०: गेल्या चोवीस तासांत विदर्भात सर्वदूर जोरदार पाऊस पडल्याने नद्या फुगल्या असून, गोसेखुर्द धरणाचे १५ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. या धरणातून १७१० क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे अहेरी तालुक्यात ७ घटनांची पडझड झाली, तर धानोरा येथे एक शौचालय कोलमडले. धानोरा-मालेवाडा मार्ग कठाणी नदीला आलेल्या पुरामुळे बंद झाला आहे. पर्लकोटा व कठाणी नद्यांमधील पाण्याच्या पातळीत जोराने वाढ होत आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु असलेला पाऊस आणखी आक्रमक रुप धारण करीत आहे. गेल्या चोवीस तासांत धानोरा तालुक्यात सर्वाधिक ९४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल चामोर्शीत ८०.४, अहेरीत ७७, सिरोंचात ७३.८ व गडचिरोलीत ७०.८ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरी ४५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे कमलापूर येथे ६ घरांची, तर जिमलगट्टा येथे २ घरांची पडझड झाली. धानोरा शहरातील विद्यानगर येथील परमेश्वर कुलमिलवार यांच्या घरचे शौचालय आज सकाळी कोसळले. हे शौचालय विद्युत खांबावरच कोलमडल्याने खांब वाकला. मात्र, रस्त्यावर कुणीही नसल्याने जीवित हानी टळली.
सतत पाऊस पडत असल्यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान गोसेखुर्द धरणाचे १५ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून १७१० क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती निवारण कक्षातर्फे देण्यात आली. धानोरा-मालेवाडा मार्ग कठाणी नदीला आलेल्या पुरामुळे बंद झाला आहे.
पर्लकोटा नदीचा जलस्तर सतत वाढत आहे. आलापल्ली ते भामरागड मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. कठाणी नदीच्या पातळीत वाढ होत आहे. गडचिरोली आरमोरी हा नागपूरला जाणारा मार्ग गडचिरोली पूल पाण्याखाली गेल्यास बंद होईल. गोसेखुर्द धरणाचे पाणी जिल्ह्यातील देसाईगंजपर्यंत यायला सुरुवात झाली आहें